अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच त्रेढातिरपीट उडाली. अनेक कर्मचाऱ्यांना तसेच शाळांना सुट्ट्या असल्याने नागरिकांना या अचानक आलेल्या पावसाचा तसा कमी फटका बसला. यानंतर सायंकाळपर्यंत कमी-अधिक सरी कोसळत होत्या. दरम्यान याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई शहर व उपनगरात रविवारीदेखील दिवसभर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी ताशी ४० ते ५० किमी वेगाच्या जोरदार वाऱ्यांसह पावसाच्या मध्यम सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
गुजरातसह अन्य मच्छिमार नौका सुरक्षेसाठी देवगड बंदरात
चिपळूणः समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक नौका देवगड येथील बंदरात सुरक्षित आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. अरबी समुद्रात वादळसदृश वातावरण तसेच अतिवृष्टी आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यानंतर मच्छिमारी करणाऱ्या शेकडो नौका आश्रयासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरात दाखल झाल्या.
भातपिकांचे मोठे नुकसान
पालघर : पालघर जिल्ह्यात पावसाने शनिवारी, सलग तिसऱ्या दिवशी हजेरी लावली. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत विजांच्या गडगडाट आणि जोरदार वादळीवाऱ्यांसह पडत असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
