• Fri. Mar 13th, 2026
    Devendra Fadnavis: दिल्ली अजून दूर, 2029पर्यंत मीच…; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

    Devendra Fadnavis: प्रसारमाध्यमांशी बुधवारी अनौपचारिक गप्पा मारताना फडणवीस यांनी याबाबत भाष्य केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

    devendra fadnavis(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : सन २०२९पर्यंत मी कुठेही जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पुढील एक-दोन वर्षांत दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांनाही पूर्णविराम दिला आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकांत मुंबईमध्ये एकत्र आणि इतर ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढवण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    मुंबई महानगर क्षेत्रात काही ठिकाणी आम्ही वेगळे, तर काही ठिकाणी युती करून लढणार आहोत. त्यातही मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, पुणे, पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढू शकतो का, याची चाचपणी होईल. विरोधकांना फायदा असेल, त्या ठिकाणी महायुती म्हणून लढून त्यांचा सामना करू, असेही ते म्हणाले. फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर पडदा पडला आहे.
    Maharashtra TimesUddhav Thackeray : तुमच्यासारखी खंबीर ताई मिळायला भाग्य लागतं… भाऊबीजेसाठी ‘लाडक्या बहिणी’ला ठाकरेंचा आवर्जून फोन, शुभेच्छा देत म्हणाले…
    मंत्रिमंडळ विस्तार नाही
    फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या फेरबदलाच्या वृत्तांचे खंडन केले. मंत्र्यांच्या कामांचे ऑडिट होईल. अर्थात केवळ मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जाईल. तूर्तास तरी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कोणताही विचार नाही. या उलट सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यांच्याकडे आमचे लक्ष आहे. त्यामुळे विस्तार होईल किंवा सध्याच्या मंत्र्यांना हटवण्याबाबत कोणतीही परिस्थिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
    Maharashtra TimesLadki Bahin : 1500 रुपयांसाठी 12431 भावांनी ‘लिंग’ बदललं! महायुती सरकारला लावला चुना, 242404500 रुपये लाटले
    खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया

    फडणवीस यांच्या विधानावर शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. सन २०२९पर्यंत नरेंद्र मोदी तरी पंतप्रधानपदी राहतील का, हा माझा प्रश्न आहे, असे राऊत म्हणाले. फडणवीस यांना शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष फोडायचे आहेत. दोन्ही गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शिंदे यांचे स्वप्न फडणवीस यांच्यामुळे धुळीस मिळाले आहे. फडणवीस हे शिंदे यांचा बंदोबस्त करायला तयार आहेत, असेही राऊत म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा