• Tue. Jun 16th, 2026

    दिवाळीच्या सणातच कोल्हापूर हादरले! तरुणाची निर्घृण हत्या, मित्रांसोबत गप्पा मारून घरी जाताना…

    दिवाळीच्या सणातच कोल्हापूर हादरले! तरुणाची निर्घृण हत्या, मित्रांसोबत गप्पा मारून घरी जाताना…

    Kolhapur Crime: कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये दिवाळीच्या रात्री पूर्ववैमनस्यातून सुनील पाथरवट या तरुणाची धारदार चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चौघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असून दोघांचा शोध सुरू आहे.

    दिवाळीच्या सणातच कोल्हापूर हादरले! तरुणाची निर्घृण हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: कोल्हापुरातील जयसिंगपूरमध्ये दीपावलीच्या रात्री घडलेल्या थरारक खुनाच्या घटनेमुळे परिसर हादरून गेला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. सुनील किसन पाथरवट (वय 32) या तरुणाचा पूर्व वैमान्यातून झालेल्या वादाच्या शेवटी धारदार चाकूने वार करून खून करण्यात आला होता. यापैकी काही संशयितांचा शोध सुरू असून पुढील तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    दिपावलीच्या सणावेळीच घडला रक्तरंजित प्रकार

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबरच्या रात्री लक्ष्मीपूजनानंतर मध्यरात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास गल्ली क्रमांक 13 मध्ये सुनील पाथरवट आपल्या मित्रांसह गप्पा मारून घरी जात होते. यावेळी शेखर पाथरवट, सागर कलगुटगी, रोहीत राडू पाथरवट, विजय उर्फ पिंटू पाथरवट, संजय आणि शिवानंद पाथरवट या सहा जणांनी पूर्ववैमनस्यामुळे राग डोक्यात ठेवून त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यात आरोपींनी चाकूने सलग वार केले. गंभीर जखमी स्थितीत सुनिलला सांगली सिव्हील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

    प्रत्यक्षदर्शीने उजेडात आणला संपूर्ण प्रकार..
    याबाबत माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत पंचनामा केला असून आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरु आहे. मृत सुनिलचा मित्र विशाल शिवाजी पवार याने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन महिन्यांपूर्वी आरोपी आणि सुनिल यांच्यात वाद झाला होता. या वादातूनच “आज याला जिवंत सोडायचं नाही” अशी धमकी देत आरोपींनी सुनीलवर हल्ला केल्याचे पवारने सांगितले. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. संशयित सहा जणांपैकी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.

    तपासासाठी नेमले पथक..
    शिरोळ विभागाचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र तपास पथक तयार करण्यात आले आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी जयसिंगपूर शहरासह आजूबाजूच्या भागात शोधमोहीम सुरु आहे. पूर्व वैमान्यातूनच ही घटना घडली असून ताब्यात घेतलेल्या संशयतांना 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी सांगितले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा