• Wed. Mar 18th, 2026
    Mumbai Fire: मुंबईतील चाळीत भीषण आग; 15 वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू, तीन जण जखमी

    Mumbai News: मुंबईतील कफ परेड येथे चाळीत भीषण आग लागली असून या दुर्घटनेत 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तसंच तीन जण जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    मुंबईतील चाळीत भीषण आग(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबईतील कफ परेड परिसरातील एका चाळीत सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत होरपळून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आणि तिघे जखमी झाले. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती. दुर्घटनेबाबतची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि एका तासाच्या आत आग विझवण्यात यश आलं आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कफ परेड येथील मच्छिमार नगरमध्ये आज पहाटेच्या सुमारास एका चाळीत अचानक आग लागली. चाळीत आग लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आणि धावपळ सुरू झाली. आगीच्या धुरामुळे आणि ज्वालांमुळे जीव वाचवण्यासाठी नागरिक सैरावैरा धावू लागले. काहींनी याबाबतची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल जाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर एका तासाच्या आत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे स्वरूप पाहता ती विद्युत वायरिंग आणि ईव्ही बॅटरीमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

    Maharashtra TimesPune Crime: पुणे हादरले! हिंजवडीत अजित पवारांच्या निकटवर्तीयाच्या मुलावर तडीपार गुंडांचा हल्ला, कारण…

    या दुर्घटनेत एका 15 वर्षीय तरुणाने आपला जीव गमावला आहे. तसंच इतर तीन जखमींना तातडीने उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले असून त्यांच्या प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

    दरम्यान, या आगीचे नेमकं कारण काय होतं, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. आगीमुळे मच्छिमार नगरमधील रहिवाशांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेकांची घरे जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार आणि खासदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्य करण्याचे निर्देश दिले असून जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा