• Sat. Mar 7th, 2026
    Vande Bharat Delay : वंदे भारत 7 तास उशिराने; ऐन दिवाळीत प्रवासी खोळंबले, इतके पैस भरुनही प्रवासहाल

    Vande Bharat 7 Hours Delay : सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस तब्बल पाच तास उशिरा धावली. वंदे भारतची कुर्डूवाडीजवळ म्हशींना धडक बसल्याने मुंबईहून नांदेडला जाणाऱ्या प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सात तास ताटकळत राहावं लागलं. त्यामुळे आपापल्या घरी निघालेल्या प्रवाशांचे ऐन दिवाळीत मोठे हाल झाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : दिवाळीच्या काळात सोलापूरहून मुंबईकडे येणारी ‘वंदे भारत’ एक्सप्रेस तब्बल पाच तास उशिरा धावली. यामुळे नांदेडला जाणारे प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर तब्बल सात तास अडकून पडले. या विलंबामुळे दिवाळीसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले.

    ‘वंदे भारत’ ही गाडी सोलापूरहून मुंबईला येते आणि त्यानंतर नांदेडसाठी रवाना होते. मात्र, या दिवशी ही गाडी पाच तास उशिरा पोहोचल्याने मुंबईत प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेषतः दिवाळीसारख्या सणाच्या वेळी घरी जाणाऱ्या प्रवाशांना या अनपेक्षित विलंबाचा फटका बसला. प्रवाशांना ताटकळत राहावे लागल्याने त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. ऐन सणाच्या दिवसात झालेला हा विलंब अनेकांसाठी गैरसोयीचा ठरला.
    Maharashtra Timesबदलापूर, कर्जत, खोपोली मार्गावरील लोकल दररोज उशिराने, बदलापूर स्थानकांत प्रवाशांचा उद्रेक, स्टेशन मास्तर कार्यालयाला घेराव

    मुंबईहून-नांदेडला जाणारी वंदे भारत 7 तास उशिरा

    दिवाळीच्या हंगामात गावी सहकुटुंब दिवाळी साजरी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या वंदे भारत एक्स्प्रेसचा पर्याय स्वीकारणाऱ्या प्रवाशांना रविवारी नाहक मनस्ताप सहन करावा लागला. सोलापूरहून मुंबईकडे येणारी गाडी आधीच पाच तास विलंबाने धावत होती. यातच कुर्डूवाडी परिसरात एक्स्प्रेसची म्हशींना धडक बसली. हीच गाडी मुंबईत पोहोचल्यावर नांदेडसाठी रवाना होते. यामुळे मुंबईहून-नांदेडला वंदे भारताने जाणाऱ्या प्रवाशांना सात तास छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात ताटकळत रहावे लागले.
    Maharashtra Timesमिठी नदीवर उभारणार नवा पूल; सायन, कुर्ला, बीकेसी मार्गावर प्रवाशांना मोठा फायदा, कुठे असणार ब्रीज? वाहतूक कोंडी दूर होणार

    5 तास वंदे भारत उशिरा असल्याचं ठोस कारण नाही

    शनिवारी धनत्रयोदशी आणि सोमवारी नरकचतुर्दशी आहे. यांमध्ये आलेल्या रविवार साधून मोठ्या संख्येने नागरिकांनी प्रवासाला सुरुवात केली. विशेषसह नियमित मेल-एक्स्प्रेससाठी प्रतीक्षायादी शेकडोपार पोहोचली आहे. आरामदायी आणि वेगवान रेल्वे प्रवासासाठी प्रवाशांची वंदे भारतला पसंती असते. मात्र रविवारी सोलापूर-मुंबई-नांदेड वंदे भारतने प्रवाशांच्या विश्वासावर पाणी फेरले. गाडी क्र. 22226 सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत रविवारी सकाळी 6.05 मिनिटांनी रवाना होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ही गाडी स. 11.07 मिनिटांनी रवाना झाली. मुळात पाच तास दोन मिनिटे विलंबाबाबत कोणतेही ठोस कारण समोर आले नाही.
    Maharashtra TimesIRCTC वेबसाइट आणि ॲप डाऊन, तिकीट बुकिंग करताना एरर; ऐन दिवाळीत हजारो प्रवाशांना मनस्ताप
    सोलापूरवरून निघाल्यावर कुर्डूवाडी परिसरात एक्स्प्रेसची तीन म्हशींना धडक बसली. त्यामुळे वंदे भारतसमोरील फायबर मिश्रित भाग मोडकळीस आला. गाडीची तपासणी करून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. यामुळे २२ मिनिटे रेल्वे एका जागी खोळंबली होती. सोलापूर-मुंबई वंदे भारत सीएसएमटीला दुपारी 12.35 ला पोहोचणे अपेक्षित होती. प्रत्यक्षात सायंकाळी सात वाजता सीएसएमटीला पोहोचली. सीएसएमटी-नांदेड वंदे भारत दु. 1.10 ऐवजी सायं. 7.47 ला मुंबईहून रवाना झाली. नांदेडला जाणारे प्रवासी सीएसएमटीत खोळंबले. अनेक प्रवाशांना गाडीची वेळ बदलल्याची माहिती केवळ दोन तास आधी देण्यात आली. यामुळे अनेक प्रवासी घरातून स्थानकाकडे रवाना झाले होते.

    Mumbra Train accident : गर्दी कमी करण्यासाठी टास्क फोर्स, सरकारचं नवं पाऊल

    नांदेड वंदे भारतसाठी ताटकळत असलेल्या प्रवाशांनी सीएसएमटीमधील व्यवस्थापक कार्यालयात तक्रार दाखल केली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाची भरपाई म्हणून तिकीटदराच्या तिप्पट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाने लेखी माफीनामा द्यावा, अशी ही मागणी केली.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा