• Fri. Mar 6th, 2026

    मुंबईकरांना आता नो टेन्शन! रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल थांबणार नाही, पालिकेने कोणता मोठा प्रकल्प हाती घेतला?

    मुंबईकरांना आता नो टेन्शन! रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल थांबणार नाही, पालिकेने कोणता मोठा प्रकल्प हाती घेतला?

    Mumbai Local News: मुंबईत रेल्वे रुळांवर पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येवर मध्य रेल्वे कायमस्वरूपी तोडगा काढणार आहे. आयआयटी मुंबईच्या शिफारशीनुसार, कुर्ला-एलटीटी परिसरात 10 कोटी लिटर क्षमतेची भुयारी टाकी उभारली जाईल. 56 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून साचलेले पाणी समुद्रात सोडले जाईल.

    रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल थांबणार नाही, पालिकेने कोणता मोठा प्रकल्प हाती घेतला?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राजधानी मुंबईत पावसाळ्यादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचण्याची मोठी समस्या निर्माण होते. लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला स्थानकादरम्यानही मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते. पाणी साचण्याच्या या समस्येवर मध्य रेल्वेकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असून आयआयटी मुंबईने केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने ‘एलटीटी’ परिसरात पाण्याची भुयारी टाकी उभारण्यात येईल. या टाकीची साठवणक्षमता 10 कोटी लिटर इतकी असणार आहे.

    मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या ( एमआरव्हीसी ) सूचनेनूसार आयआटी मुंबईकडून रेल्वे रुळांवर पाणी भरण्याची ठिकाणे व त्यावरील उपायांबाबत अभ्यास करून शिफारसी सुचवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेवरील कुर्ला ते एलटीटी व पश्चिम रेल्वेवरील दादर ते लोअर परळ यादरम्यान विभागांची पाहणी करण्यात आली असून त्यात पूर व्यवस्थापनासाठी प्रभावी व परवडणाऱ्या उपायांसह पाण्याच्या प्रवाहाचे विश्लेषण करण्यात आलं आहे. याबाबत सविस्तर सर्वेक्षण अहवाल रेल्वे प्रशासनाकडे सादर करण्यात आला अलून मुंबई महानगरपालिकेने बांधलेल्या पाणी साठवण्याच्या टाकीप्रमाणे कुर्ला-एलटीटी परिसरात 1 लाख 168 घनमीटर क्षमतेची भुयारी टाकी बसवण्याची तयारी सुरू केली आहे.

    किती कोटींचा प्रकल्प?

    रेल्वे रुळांवर पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी 56 कोटी रुपयांचा मोठा प्रकल्प हाती घेण्यात येईल. या प्रकल्पाअंतर्गत भुयारी टाक्या उभारल्या जाणार असून, त्यामध्ये पावसाचे पाणी जमा केले जाणार आहे. पाऊस ओसरल्यावर या टाक्यांमधील पाणी पंपांच्या साहाय्याने समुद्रात सोडलं जाईल. रेल्वे प्रशासनाने या टाक्या उभारण्याची प्रक्रिया सुरू केली असून सध्याच्या टाक्यांची क्षमता कमी असल्यामुळे हा नवीन प्रकल्प आवश्यक आहे.
    कुर्ला ते एलटीटी हा मध्य रेल्वेवरील असा भाग आहे, जिथं मुसळधार पावसाने सर्वाधिक पाणी साचतं. यामुळे रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम होतो. या समस्येवर मात करण्यासाठीच साचणारे पाणी भुयारी टाक्यांमध्ये जमा केले जाणार आहे. जेव्हा पावसाचा जोर कमी होईल व पाणी ओसरण्यास सुरुवात होईल, तेव्हा उच्च दाबाच्या पंपांचा वापर करून या टाक्यांमधील पाणी समुद्रात सोडण्यात येणार आहे. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासन या टाक्या उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

    दरम्यान, सध्या सेंट झेवियर्स ग्राउंड व प्रमोद महाजन कला पार्क इथं पाणी साठवण्यासाठी टाक्या आहेत. परंतु, या टाक्यांची क्षमता कमी असल्याने पूरस्थिती निर्माण झाल्यास त्या पूर्ण भरून जातात व रुळांवर पाणी साचतं. यामुळेच अहवालात इतर ठिकाणीही पाणी साठवण टाक्या उभारण्याची शिफारस करण्यात आली असून रेल्वेच्या मालकीची नसलेल्या जमिनींवर महानगरपालिकेकडून येणाऱ्या पाण्यासाठी महापालिकेकडून दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा