Nagpur Crime : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, नागपुरात दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. काल बुधवारी एकाचवेळी रात्री दोन तरुणांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण नागपूर हादरलं आहे.
अल्पवयीन मुलांनी कुख्यात गुंडाला संपवलं
पहिली घटना इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जाटतरोडी परिसरात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, बाला अंबाडारे उर्फ नीलेश (वय अंदाजे 30) हा परिसरात दहशत माजवणारा गुन्हेगार म्हणून ओळखला जात होता. त्याच्याविरुद्ध इमामवाडा, अजनी, गणेशपेठ आणि सीताबर्डी पोलिस ठाण्यांमध्ये तब्बल 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत. नीलेश काही दिवसांपासून परिसरातील काही रहिवाशांशी पैशांच्या व्यवहारावरून वाद घालत होता. बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास या वादातून दोन अल्पवयीन मुलांशी त्याचं भांडण झालं. संतापाच्या भरात या दोघांनी जवळच पडलेल्या दगडाने नीलेशच्या डोक्यात वार करून त्याची जागीच हत्या करण्यात आली.
मोठी अपडेट: अशोकस्तंभ ते चैत्यभूमी, इंदू मिल पर्यंतचा मार्ग होणार सुकर; समुद्रालगतची जागा हस्तांतरणाच्या सूचना जारी
घटनेनंतर इमामवाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठविले आहे. पोलिसांनी सांगितलं की, मृत नीलेशविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून तो काही दिवसांपासून गणेशपेठ पोलिस त्याचा शोध घेत होती. स्थानिक नागरिकांनी सांगितलं की, नीलेशच्या मृत्यूमुळे परिसरात भीती आणि दिलासा दोन्ही भावना व्यक्त होत आहेत.
जुन्या वादातून तरुणाची हत्या
दरम्यान, दुसरी घटना नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नेरी गावातील वीटभट्टी परिसरात घडली. जुन्या वैमनस्यातून देवा वंजारी नावाच्या युवकाने विवेक तांडेकरवर चाकू आणि ट्रकच्या जॅकने वार करून त्याची हत्या केली. ही घटना देखील काल बुधवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली. गावातील काही नागरिकांना विवेक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसताच त्यांनी पोलिसांना कळवलं.
Nilesh Ghaywal : निलेश घायवळचा आणखी एक कारनामा समोर, पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड? पुण्यात खळबळ
कामठी पोलिसांनी रात्री एक ते दोनच्या सुमारास घटनास्थळी पोहोचून विवेकला रुग्णालयात दाखल केलं, परंतु तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी आरोपी देवा वंजारीला अटक केली असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. प्राथमिक चौकशीत उघड झालं आहे की, विवेक आणि देवा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून गावातील वर्चस्वावरून वाद सुरू होता. अखेरीस या वैमनस्यातूनच ही हत्या घडल्याचं समोर आलं आहे.
दिवाळीच्या सणात आनंदाचं वातावरण असताना अशा दुर्दैवी घटनांनी नागपूरकरांना हादरवून सोडलं आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांच्या तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली असून शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गस्त वाढविण्यात आली आहे.

