Bachchu Kadu News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकालातील काही योजनांना फडणवीस सरकारमध्ये ब्रेक लावण्यात आला आहे. अशातच सरकारविरोधात गेलेल्या बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे नरिमन पॉइंट येथील कार्यालय रद्द केले आहे.
राज्य सरकारने ऑगस्ट २०२३मध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला नरिमन पॉइंट येथील बरॅक क्रमांक १० येथे जागा देण्यात आली होती. याठिकाणी आधी जनता दल (सेक्यूलर) पक्षाचे कार्यालय होते. बरॅकमधील कक्ष क्रमांक एक आणि दोन मिळून एकूण ९०९ चौ. फूट जागेपैकी तब्बल ७०० चौ. फूट जागा प्रहारला देत फक्त २०० चौ. फूट जागा जनता दलाला ठेवण्यात आली होती. याविरोधात जनता दल पक्षाने न्यायालयात दाद मागितली होती, हा प्रश्न सध्या न्यायप्रविष्ट आहे. २०२४नंतर महायुतीशी फारकत घेतल्यापासून कडू यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारने प्रहारचे कार्यालय काढून घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. सामान्य प्रशासन विभागाने प्रसृत केलेल्या शासन निर्णयानुसार, ही जागा आता पूर्णपणे जनता दलाला देण्यात येणार आहे. प्रहारला राज्य सरकारने पर्यायी जागा दिलेली नाही. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे प्रहार पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले.
ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार? मनसेच्या संदीप देशपांडेंनी सांगितली आतली गोष्ट; म्हणाले आघाडीत…
‘बच्चू कडू हे सतत जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी लढत आहेत. शेतकरी कर्जमाफी, रोजगार धोरण आणि सरकारी भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी अनेकवेळा आवाज उठवला आहे. सरकारला त्यांच्या टीका आणि आंदोलनामुळे त्रास होत असल्याने, त्यांच्यावर खोट्या गुन्ह्यांची नोंद करणे, आंदोलनांवर बंधने आणणे आणि पक्षाचे कार्यालय काढून घेणे, हे सर्व दबाव आणण्याचे प्रयत्न आहेत.
मोठी बातमी! ठाकरे बंधू एकत्र येण्याआधीच वितुष्ट? संजय राऊत यांच्या वक्तव्याने मनसेत नाराजीची चर्चा
प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाच, राज्य सरकारने कोणतीही न्यायसंगत प्रक्रिया न पाळता आणि पक्षाची बाजू न ऐकता कार्यालय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यालय रद्द केल्याने आमचा जनतेसाठीचा लढा थांबणार नाही’, अशी प्रतिक्रिया याविषयी पक्षाचे प्रवक्ते मनोज टेकाडे यांनी दिली. दरम्यान न्यायप्रविष्टतेमुळे पक्षाने या कार्यालयाचा आजवर वापरच केला नसल्याचे समजते.

