• Sat. Mar 7th, 2026

    पनवेलमधून १३ हजार किलो फराळ सीमेवर; दिवाळीपूर्वी १५ हजार सैनिकांपर्यंत पोहोचणार लाडू, चिवडा

    पनवेलमधून १३ हजार किलो फराळ सीमेवर; दिवाळीपूर्वी १५ हजार सैनिकांपर्यंत पोहोचणार लाडू, चिवडा

    Diwali 2025: ​​लेह, सियाचीन, तवांग, अरुणाचल प्रदेश, गुवाहाटी, जम्मू-कश्मीर, पुंछ, राजस्थान, बारमेर, जैसलमेर अशा देशाच्या सर्वच्या सर्व सीमेवर फराळ पोहचेल याची व्यवस्था केली गेली आहे.

    diwali faral 2025(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    कुणाल लोंढे, पनवेल: पनवेलमधून ६० हजार लाडू, ६० हजार चकल्या, १ हजार ८७५ किलो शेव, चिवडा आणि शंकरपाळे असा एकूण १३ हजार ५० किलोचा फराळ देशाच्या सीमेवर रवाना झाला. प्रतिकूल परिस्थितीत देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना भारत विकास परिषदेच्या माध्यमातून फराळ पाठवला जातो. लोकसहभागातून सुरू असलेल्या उपक्रमाचे यंदा सहावे वर्ष आहे.

    यंदाही दिवाळीपूर्वीच पनवेलकरांचा फराळ भारताच्या प्रत्येक सीमेवर पोहचविण्याचा प्रयत्न परिषदेच्या माध्यमातून केला आहे. सैनिकांना फराळ दिवाळीत मिळावा, हा उद्देश ठेवून यंदाही जुलैपासून तयारी सुरू केली होती. १५ हजार सैनिकांना प्रत्येकी ९०० ग्रॅम फराळ पाठविण्याचे नियोजन केले होते. एका सैनिकासाठी एका बॉक्समध्ये ४ लाडू, ४ चकली, शेव, शंकरपाळे, चिवडा प्रत्येकी १२५ ग्रॅम असा ९०० ग्रॅम वजनाचे पंधरा हजार बॉक्स तयार करण्यात आले.
    Maharashtra Timesदुचाकीवरील ताबा सुटला आणि एका मागोमाग एक… पाम बीच रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; दोन जण गंभीर जखमी
    प्रत्यक्ष आर्थिक मदत करू न शकणाऱ्या व्यक्तींना फराळाचे बॉक्स पॅकिंग करून श्रमदान करण्याचे आवाहन केले होते. अनेक तरुणांनी या उपक्रमात भाग घेतला. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या उपक्रमासाठी यंदा तब्बल ४० लाखांचा खर्च झाला. यंदाचे उद्दीष्ट पूर्ण झाल्यामुळे १५ दिवस आधीच देणगी स्वीकारणे बंद केल्याचे परिषदेचे अध्यक्ष सुबोध भिडे यांनी सांगितले.

    १२ हजार शुभेच्छापत्रे
    फराळाच्या बॉक्समध्ये यंदा शालेय विद्याथ्यांनी सैनिकांना दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी काढलेली शुभेच्छापत्रे पाठविण्यात आली आहेत. परिषदेच्या पनवेल शाखेने राज्यभरातील अनेक शाळांना आवाहन करून शुभेच्छापत्रे मागिवली जातात. ही शुभेच्छापत्रे फराळासोबत पाठवली जातात.
    Maharashtra Timesदिवाळीच्या सुट्टीत फिरायला जाताय? जरा सांभाळून, ट्रॅव्हल पॅकेजसाठी सावधगिरी आवश्यक; जाहिरातींना भुलू नका
    फराळ पोहचल्यानंतर अनेकांचे मेसेज येतात, फोन येतात. जवानांची आठवण ठेवल्याबद्दल अनेक जण आभार मानतात. सीमेवरील महाराष्ट्रातला सैनिक अभिमानाने सांगतो, माझ्या महाराष्ट्रातून फराळ आला आहे. त्यावेळी या उपक्रमाचे सार्थक झाल्याचे वाटते. -सुबोध भावे, अध्यक्ष भारत विकास परिषद, पनवेल शाखा

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा