• Sat. Mar 7th, 2026
    Eknath Shinde: उंबरठा न ओलांडणारे हंबरडा मोर्चा काढतायत; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

    Eknath Shinde On Uddhav Thackeray: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने विक्रमी ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असतानाही ठाकरे शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करत आहेत’, असा आरोप शिंदे यांनी केला.

    shinde thackeray2(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.प्रतिनिधी, ठाणे: पूर्वी सत्तेत असताना जे ‘घराचा उंबरठा ओलांडत नव्हते, ते आता हंबरडा मोर्चा काढत आहेत. सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हाही हंबरडा फोडला, आणि आता पुन्हा हंबरडा मोर्चा काढत आहेत’, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

    ठाण्यात म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या लॉटरी प्रक्रियेनंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी छत्रपती संभाजी महाराजनगर येथे उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चावर शिंदे यांनी टीका केली. ‘आम्ही स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. शेती वाहून गेलेली, घरांची पडझड झालेली पाहिली. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील वेदना पाहून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे ठरवले. म्हणूनच राज्य सरकारने ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले व तातडीची १० हजार रुपयांची मदत त्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे’, असे शिंदे यांनी सांगितले.
    Maharashtra TimesTrain Cancelled: रेल्वेप्रवाशांसाठी मोठी बातमी! दोन दिवस मुंबई, पुण्यातून सुटणाऱ्या ‘या’ एक्स्प्रेस रद्द, यादी पाहा
    मोदी – शहा यांचा पाठिंबा
    काही जण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढतात, परंतु त्या शेतकऱ्याच्या मुलाच्या हातात बिस्किट तरी दिले का? आम्ही मात्र मोठे मदतसंच पाठवले, असा टोला शिंदे यांनी ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शेतकरी सावरल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याला ठोस आधार मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही’, असे ते म्हणाले.
    Maharashtra Timesमुंबई पोलिसांसाठी Good News! तुमच्यासाठी सरकार बांधणार ५५ हजार घरे; ७५ भूखंडांवर गृहप्रकल्प
    ‘उद्धव ठाकरे सत्तेसाठी कोणत्याही थराला जातील’
    मुंबई : ‘उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी ‘एमआयएम’च काय, पाकिस्तानलाही सोबत घेतील. निवडणूक जिंकण्यासाठी ते काहीही करू शकतात,’ अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा बैठका सुरू केल्या आहेत. चेंबूर येथील एका बैठकीत बोलताना शिंदे यांनी ठाकरे यांना लक्ष्य केले. ‘मुंबईत ठाकरेंनी भरपूर घोटाळे केले आहेत. त्यामुळे मुंबईत केलेल्या चुकांसाठी त्यांनी स्वत:वरच आसूड ओढून घ्यायला हवा,’ असे शिंदे म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा