• Thu. Mar 12th, 2026
    Ramdas Kadam: आठ हजार रहिवाशांना धमकावून घरे रिकामी केली; कदमांचा परब यांच्यावर नवा आरोप

    Ramdas Kadam vs Anil Parab: अनिल परब यांच्यामुळेच शिवसेना फुटली. सर्व लोक पक्षातून बाहेर पडले त्याला हाच चमचा कारणीभूत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

    kadam vs parab(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : विलेपार्ले येथील एका एसआरए योजनेतील आठ हजार रहिवाशांना घरे रिक्त करण्यासाठी शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अनिल परब यांनी धमकी दिली असून, हे मराठी रहिवासी देशोधडीला लागले आहेत,’ असा आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी रविवारी केला.

    ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता. त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले,’ असा सनसनाटी आरोप कदम यांनी अलीकडेच केला होता. त्यावर परब यांनी पत्रकार परिषद घेऊन कदम यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. यानंतर कदम यांनी रविवारी पुन्हा परब यांना लक्ष्य केले. ‘परब यांनी त्यांच्या विभागात किती लोक निवडून दिले? त्यांना फक्त चुगल्या करायला आवडतात आणि उद्धव ठाकरे यांनाही अशीच माणसे आवडतात,’ असे ते म्हणाले.
    Maharashtra Timesमोठी बातमी! महाराष्ट्रात ‘कोल्ड्रिफ’ सिरपवर बंदी, खोकल्याचं हे औषध कुठल्याही मेडिकलमध्ये सापडलं तर फोन करा
    ‘विलेपार्ले येथील एसआरएच्या योजनेसंदर्भातील प्रतिज्ञापत्र माझ्याकडे आहे. ही योजना अजून पूर्ण झालेली नसून, परब यांनी आठ हजार मराठी माणसांना घरे रिक्त करण्यासाठी धमकी दिली. या योजनेतील रहिवाशांना फ्लॅट देईन, असे अनिल परब यांनी सांगितले होते. ‘या आठ हजार रहिवाशांना फक्त एक वर्षाचे भाडे दिले. ही मराठी माणसे नऊ वर्षांपासून मुंबईबाहेर आहेत. हे पैशासाठी बिल्डरांचे पाय चाटतात. उबाठाचे पदाधिकारी संजय कदम आणि अनिल परब यांनी कोट्यवधी रुपये कमावले. बिल्डरने यांना मर्सिडीज दिल्या. संजय कदमने बाइक वाटल्या. याबाबत तिथल्या रहिवाशांनी याबाबत प्रतिज्ञापत्रे दिली आहेत,’ असे कदम म्हणाले.
    Maharashtra Timesराज्यात वाढतोय मलेरियाचा ताप! ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण दगावले, चिंताजनक आकडेवारी समोर
    ‘तो डान्स बार नाही’
    परब यांनी डान्सबारवरून कदम यांना लक्ष्य केले होते. त्याला कदम यांनी उत्तर दिले. ‘तो डान्सबार नव्हता, फक्त ऑर्केस्ट्रा होता. त्यासाठीची परवानगी होती. फक्त कदम कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी डान्सबार डान्सबार म्हणून बदनाम केले गेले. मी न्यायालयात जाणार आहे. हे हॉटेल ३० वर्षांपासून आहे. एक तरुणी अनुचित हावभाव करत होती, म्हणून मी त्या शेट्टीला काढले. परवाना रद्द केला. दीड महिन्यानंतर अनिल परब बोलले. त्यांना झोपेतून आता जाग आली, मुलींचे पैसे खाणारा मी नाही,’ असे कदम म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा