• Sat. Mar 7th, 2026

    बाळासाहेब गेल्यावर उद्धव ठाकरेंनी…; रामदास कदमांनी बोलण्याच्या ओघात ४ महत्त्वाचे किस्से सांगितले

    बाळासाहेब गेल्यावर उद्धव ठाकरेंनी…; रामदास कदमांनी बोलण्याच्या ओघात ४ महत्त्वाचे किस्से सांगितले

    रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचे पार्थिव दोन दिवस मातोश्रीवर ठेवले होते. दसरा मेळाव्यात बोलण्याची संधी नाकारली, असे दावे त्यांनी केले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव उद्धव ठाकरेंनी २ दिवस मातोश्रीवरच ठेवल्याचा दावा करत या सगळ्याबद्दल संशय व्यक्त केला. रामदास कदम यांच्या आरोपांना शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांनी उत्तर दिलं. मग रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत परब यांच्यावर तोफ डागली. शिवसेनेच्या दोन गटांमध्ये जुंपलेली असल्यानं काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा झाला.

    बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाला जवळपास १३ वर्ष उलटलेली आहे. मग त्यांच्या निधनानंतर पार्थिव २ दिवस मातोश्रीवर का ठेवण्यात आलं, याचा उल्लेख आताच का केला, असा प्रश्न रामदास कदम यांना विचारण्यात आला. त्यावर कदम यांनी बाळासाहेब ठाकरे हृयात असताना आणि हृयात नसताना आपल्याला पक्षात नसलेली वागणूक याकडे लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी काही महत्त्वाचे किस्से सांगितले. बोलण्याच्या ओघात रामदास कदम यांनी अनेक गोष्टी सांगितल्या.

    बाळासाहेब ठाकरे हृयात असताना दसरा मेळाव्यात माझं भाषण व्हायचं. बाळासाहेब ठाकरे हृयात असताना ते मला मेळाव्यात बोलण्याची संधी द्यायचे. पण बाळासाहेब ठाकरे गेले आणि उद्धव ठाकरेंनी वक्त्यांच्या यादीतून आपलं नाव वगळलं. उद्धव ठाकरेंनी असं का केलं, मला का बोलू दिलं नाही, असा प्रश्न रामदास कदम यांनी विचारला.

    बाळासाहेब ठाकरे हृयात असताना पक्षाच्या व्यासपीठावर मला पहिल्या रांगेत स्थान असायचं. साहेबांनी कायम माझा सन्मान केला. पण साहेबांचं निधन झाल्यावर मला व्यासपीठावर कोणत्या रांगेत स्थान देण्यात आलं? मागच्या रांगेतील खुर्चीवर माझं नाव लिहिण्यात यायचं, अशी खदखद कदम यांनी बोलून दाखवली.

    बाळासाहेबांच्या निधनानंतर २०१४ मध्ये उद्धव ठाकरेंनी तुम्हाला मंत्रिपद दिलं, याची आठवण पत्रकारांनी कदम यांनी करुन दाखवली. त्यावर लोक हसतील म्हणून त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मला मंत्री केलं. पण खातं कोणतं दिलं? पर्यावरण मंत्रालय. त्यांचा नाईलाज होता, म्हणून मला मंत्री केलं, असं कदम म्हणाले.

    दिवाकर रावते आणि मी पक्षात ज्येष्ठ होतो. मग आम्हाला २०१९ मध्ये मंत्रीपदं का दिली नाहीत? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण रावते आणि मला डावललं. उद्धव ठाकरेंनी अगदी अपक्षांना मंत्रीपदं दिली. त्यांच्यासाठी हेलिकॉप्टर्स पाठवली. त्या नेत्यांचं काय योगदान होतं शिवसेना वाढवण्यात, असा सवाल कदम यांनी विचारला.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा