• Mon. Mar 9th, 2026
    मराठवाड्यासह सोलापूरला पुराने वेढलं, शिर्डी साई संस्थान मदतीसाठी सरसावलं; अतिवृष्टीग्रस्तांसाठी मोठी मदत

    Shirdi Sai Santhan Relief fund to Flood Affected : मराठवाडा आणि सोलापूरला पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतशिवार पाण्याखाली गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. संत गजानन महाराज संस्थानने १ कोटी, लालबागच्या राजाने ५० लाखांची मदत जाहीर केली. आता शिर्डी साईबाबा संस्थाननेही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटींची मदत दिली आहे. राहाता तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी भक्तनिवास आणि साईप्रसादायल खुले केले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अहिल्यानगर : मराठवाड्यासह सोलापूरला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. महाप्रलयामुळे अनेक घरांसह शेतशिवारं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे सर्वत्र विनाशाचे विदारक चित्र आहे. बळीराजा पुरता संकटात सापडला आहे. बळीराजासाठी अनेक सेवा संस्था तसेच मंदिर संस्थानांनी मदतीचा हात सरसावला आहे. संत गजानन महाराज संस्थानने १ कोटीची मदत जाहीर केली, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून अतिवृष्टीग्रस्तांना ५० लाखांची मदत देण्यात आली. यातच आता शिर्डी साईबाबा संस्थानने देखील मदतीसाठी तिजोरी उघडली आहे.

    मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्याला पूर्णत: पुराने वेढले आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनेकजण बेघर होऊन रस्त्यावर आले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे विदारक चित्र निर्माण झाले आहे. या अतिवृष्टीतील बाधितांसाठी शिर्डी संस्थानने एक कोटींची मदत जाहीर केली आहे. जी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पाठवण्यात येणार आहे. यासोबतच राहाता तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी भक्तनिवास आणि साईप्रसादायल खुले असणार आहे.

    गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यात पावसाची कोसळधार सुरुच आहे. जो या हंगामातील सर्वाधिक पाऊस आहे. पावसामुळे कापणीच्या तोंडावर पीक पाण्याखाली गेली आणि शेतकऱ्याची चिंता वाढली. मायबाप सरकारने आर्थिक नुकसानी पाहता त्याची भरपाई द्यावी, अशी आर्त मागणी केली जात आहे.

    शेगावच्या गजानन महाराज संस्थानने देखील सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. संस्थानच्या वतीने पुरग्रस्तांच्या तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सोपविण्यात आला आहे. संस्थेचे प्रतिनिधी यांनी २७ सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदतीचा धनादेश सुपूर्द केला आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा