• Tue. Mar 10th, 2026

    पाऊस : रायगड जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात उद्या रेड अलर्ट – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Sep 27, 2025
    पाऊस : रायगड जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात उद्या रेड अलर्ट – महासंवाद

    मुंबई, दि. २७:- रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात २८ सप्टेंबर २०२५ रोजीसाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह  सातारा घाट व कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

    ‘सचेत’च्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेच्या पूर्वसूचना देण्यात येत असून भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र या केंद्रीय संस्थांसोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे.

    सोलापूर जिल्ह्यात सीना नदी वडकबाळ येथे इशारा पातळीच्यावर वाहत आहे. तर टाकळी येथे भीमा नदी इशारा पातळीच्यावर वाहत आहे. सीना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने स्थानिक पथके तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्याची दक्षता घेण्यात येत आहे.

    अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली असून खैरी धरणातून सकाळी ९.३० पासून १६,७४३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्याची दक्षता घेण्यात येत आहे. जामखेड तालुक्यातील दरडवाडी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सुरक्षेस्तव जामखेड ते खर्डा वाहतूक बंद करण्यात आली आहे.

    धाराशिव जिल्ह्यात परांडा आणि भूम येथे मुसळधार पावसामुळे  पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्याची दक्षता घेण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची दोन पथके पुणे येथून रवाना करण्यात आली आहेत.

    बीड जिल्ह्यात २० सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद (६५ मिमी.) झाली असल्याने आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्याची दक्षता घेण्यात येत आहे.

    लातूर जिल्ह्यात सरासरी ७५.३ मिमी. इतक्या पावसाची नोंद झाली असल्याने अहमदपूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. छिलखा बॅरेज येथे चार नागरिकांना वाचवण्यासाठी स्थानिक पथकाच्या सहाय्याने बचाव कार्य सुरु आहे. जिल्ह्यात ६० रस्ते सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक नांदेडहून लातूर, अहमदपूरसाठी पाठविण्यात येत आहे.

    राज्यात मागील २४ तासात सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे :- लातूर जिल्हा ७५.३ मिमी., हिंगोली ६६.२ मिमी., परभणी ५४.९ मिमी., धाराशिव ५४.५ मिमी. आणि गडचिरोली जिल्ह्यात ५३.५ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच वर्धा जिल्ह्यात वीज पडून दोन व्यक्तींचा मृत्यू तर एक व्यक्ती जखमी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

    000

    एकनाथ पोवार / विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed