• Fri. Mar 13th, 2026
    दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार, कृषीमंत्र्यांचा शब्द; कर्जमाफीवर दिला विश्वास

    Dattatraya Bharane on Agriculture Loss : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना, राजकारणात वैयक्तिक टीका टाळण्याचे आवाहन केले आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे त्यांनी आश्वासन दिले. कर्जमाफीबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, बारामती : भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला होता. या विधानावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भरणे म्हणाले की, कोणीही असुद्या, कोणी कोणावर वैयक्तिक टीका राजकारणात करू नये. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत खुलासा केला आहे, अशी प्रतिक्रिया भरणे यांनी दिली.

    पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे ग्रामीण रुग्णालयात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ‘ स्वस्थ नारी सशक्त परिवार’ या अभियानाचे उद्घाटन पार पडले. यावेळी भरणे यांनी पत्रकारांची संवाद साधला.

    दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार

    राज्यात मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे झाले. मात्र अद्याप काही शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळाली नसताना सध्याही राज्याच्या विविध भागात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याचे पंचनामे सुरू आहेत. मात्र दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

    कर्जमाफीची योग्य वेळ कधी?

    कर्जमाफीची योग्य वेळ कधी येणार? या प्रश्नावर बोलताना भरणे म्हणाले की, शेतकरी आज खूप अडचणीत आहे. कधी दुष्काळ पडतोय कधी अतिवृष्टी कधी गारपीट होत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहणं काही ना काही त्यांना आर्थिक पाठबळ देणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे ज्येष्ठ आहेत योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    रोहित पवारांच्या प्रश्नावर बोलताना भरणे म्हणाले की, मी काल अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड दौऱ्याच्या दौऱ्यावर होतो. अधिकारी असतो कामकाज करताना थोडं कमी जास्त होत असेल. मी ते जास्त ऐकलेलं नाही. एखादा अधिकारी चुकला असला तर त्याला शेवटी कागदावर घेऊन काही गोष्टी बोलल्या पाहिजेत, असेही भरणे यावेळी म्हणाले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा