• Sat. Mar 14th, 2026

    Kolhapur Crime: प्रेमविवाहाला मदत केल्याचा राग; तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या टोळक्याचा दाम्पत्यावर हल्ला, बोटं तुटून पडली, कोल्हापुरात दहशत

    Kolhapur Crime: प्रेमविवाहाला मदत केल्याचा राग; तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या टोळक्याचा दाम्पत्यावर हल्ला, बोटं तुटून पडली, कोल्हापुरात दहशत

    Kolhapur Attack On Couple: कोल्हापुरात एक भयंकर घटना घडली आहे. प्रेमविवाहाला मदत केल्याच्या रागातून एका दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेने कोल्हापुरात एकच खळबळ माजली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: कोल्हापुरात मागील काही दिवसात दहशतीचे प्रकार घडत असतानाच हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजीजवळील कबनूर गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमविवाहाला मदत केल्याच्या वादातून शनिवारी एका दाम्पत्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. प्रमोद बाबासो शिंगे (वय 39) आणि त्यांची पत्नी अश्विनी शिंगे अशी या हल्ल्यात जखमी झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी चौघांना ताब्यात घेऊन सखोल तपास सुरु केला आहे.

    प्रमोद शिंगे यांच्या मित्राने काही काळापूर्वी प्रेमविवाह केला होता, ज्याकरिता प्रमोद यांनी त्याला मदत केली होती. या विवाहाला विरोध करणाऱ्या जमीर हासीम मुलाणी (वय 50) आणि त्यांच्या मुलगा आर्यन (वय 30, रा. जांभळी, ता. शिरोळ) यांच्यासह त्यांचे दोन साथीदारांनी राग मनात धरला होता. त्यांनी प्रमोद यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. प्रेमविवाहाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यात मनात राग असल्यानेच हा गंभीर हल्ला घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

    नेमकं काय घडलं..?

    शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रमोद व अश्विनी शिंगे कामासाठी ग्रामपंचायतीमध्ये गेले होते. काम संपल्यावर ते चारचाकी गाडीत बसत असताना, तोंडावर स्कार्फ बांधून आलेल्या चार ते पाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने जोरदार हल्ला केला. या खुनी हल्ल्यामध्ये प्रमोद यांच्या उजव्या हाताचे बोट तुटले, तसेच खांदा, पोट आणि मानेवरही गंभीर जखमा झाल्या. तर पत्नी अश्विनी यांनी हल्लेखोरांना थांबविण्याचा प्रयत्न केला असतानाच त्यांनाही हाताच्या पंजावर मार लागला. हल्लेखोरांनी दहशत माजवून दाम्पत्याच्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या, ज्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला. परिसरातील नागरिक जमल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

    या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. आरोपींच्या शोधासाठी ताबडतोब कारवाई केली. जखमी दाम्पत्याला इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरुन तीन हत्यारे जप्त केली आहेत. याठिकाणी प्रमोद यांचे तुटलेले बोटही सापडले आहे. शिवाजीनगर पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांनी खुनी हल्ला, ॲट्रॉसिटीसह संबंधित गुन्हा नोंदवला आहे. तसेच आरोपी जमीर मुलाणी व त्यांचा मुलगा आणखी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

    दरम्यान, ही घटना कबनूर पोलिस चौकीपासून अगदी 70-80 फूट अंतरावर घडल्याने गावात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी पोलिसांकडे अधिक सुरक्षेची मागणी केली असून पोलिसांनी गावातील तपास वाढवला आहे. आरोपींनी भागातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याचेही समोर आले आहे, ज्यामुळे तपास अधिक कठीण झाला. दरम्यान हा हल्ला प्रेमविवाहासाठी केलेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर झाल्यामुळे सामाजिक स्तरावरही मोठी खळबळ उडाली आहे. जखमी दाम्पत्य लवकरात लवकर बरे होण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर पोलिसही घटना गांभीर्याने घेत पुढील कारवाई करत आहेत.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा