Manoj Jarange on Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी तीव्र लढा उभारण्याचा इशारा दिल्यानंतर, मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रहार केला आहे. जरांगे पाटील यांनी भुजबळांना विसरभोळा म्हणत, त्यांना नेपाळ किंवा नागालँडमध्ये सोडायला हवे, असे म्हटले आहे. भुजबळांनी मराठा आरक्षणावर अतिक्रमण केल्याचा आरोपही त्यांनी केला.
काय म्हणाले जरांगे पाटील?
जरांगेंनी भुजबळांवर प्रहार करत म्हटले, ‘तुझ्या आरक्षणावर कुणी अतिक्रमण केलंय, ह्याच्या ध्यानातच काही राहिना झालंय, आता हा विसरभोळा मंत्री झाला आहे.’ जरांगे पुढे म्हणाले, ‘तु 32 टक्के खातो, असा मंत्री देशात आहे का कुणी? आतापर्यंत याने आमचं आरक्षण खाल्लं आहे, तेच आम्ही परत घेत आहोत, गरीब ओबीसींनी हे समजून घ्यावे.’ जरांगेंनी आरक्षणाच्या मु्द्द्यावरुन म्हटले की, आरक्षण रद्द करायचं आहे का? तू इतके दिवस खात होता ते रद्द करायचं आहे का? तू प्रगत झाला आहे. तू ते आरक्षण सोड ना. तुझं अजूनही पोट भरत नाही का? भरत्या, शिक्षण, सगळं यानेच खाल्लं आहे. ओबीसींनी याचं ऐकू नये डोळे लाल दिसू नये म्हणून याने आज काळा चष्मा घातला आहे, याला आता यापुढे विसरभोळा मंत्री नाव द्यावे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
मराठ्यांच्या मुंबईतील आंदोलनावरही भुजबळांनी टीका केली होती. याबद्दल विचारले असता जरांगे म्हणाले, देवाने अक्कल दिली असती तर बरं झालं असतं, मुंबईत मराठ्यांची पोरं गेली. महाराष्ट्राला एक संस्कृती दिसली. मुंबईचे जणू खरे मालकच ही पोरं होती, तिथले लोक पाहुणे आहेत. हा इथं शोभत नाही, या जनावराला नेपाळ, इकडे तिकडे सोडायला हवं, याला नागालँड, इंग्लंड अशा ठिकाणी सोडायला पाहिजे, असा घणाघात जरांगेंनी केला आहे.

