• Mon. Mar 16th, 2026
    ‘ओबीसीत कुणी अतिक्रमण केलंय? तुम्ही ३२ टक्के खाल्लंत…,’ जरांगेंचा भुजबळांवर जोरदार प्रहार

    Manoj Jarange on Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी तीव्र लढा उभारण्याचा इशारा दिल्यानंतर, मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रहार केला आहे. जरांगे पाटील यांनी भुजबळांना विसरभोळा म्हणत, त्यांना नेपाळ किंवा नागालँडमध्ये सोडायला हवे, असे म्हटले आहे. भुजबळांनी मराठा आरक्षणावर अतिक्रमण केल्याचा आरोपही त्यांनी केला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जालना : मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी तीव्र लढा उभारण्याचा लातूरमधून इशारा दिला आहे. ओबीसी आरक्षण संपण्याच्या भीतीपोटी लातूरमधील वांगदरी येथील एका तरुणाने नदीत उडी घेत आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी भुजबळ वांगदरी गावात पोहोचले. यावेळी त्यांनी तरुण भरत कराड याच्या मुलीचे अश्रुही पुसले. तर ‘बलिदान वाया जाऊ देणार नाही,’ असे कुटुंबीयांना म्हटले. तसेच मराठ्यांना इशारा देत छगन भुजबळांनी म्हटले की, आरक्षणाच्या लढाईसाठी बलिदान देण्याची वेळ ओबीसी बांधवावर आली. ओबीसीत अतिक्रमण करू नका, अन्यथा तीव्र लढा उभारु. यावर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रहार केला आहे. जरांगे पाटील यांनी भुजबळांना विसरभोळा म्हणत त्यांना तिकडं नेपाळ, नागालँडमध्ये सोडायला हवं, अशी बोचरी टीका केली.

    काय म्हणाले जरांगे पाटील?

    जरांगेंनी भुजबळांवर प्रहार करत म्हटले, ‘तुझ्या आरक्षणावर कुणी अतिक्रमण केलंय, ह्याच्या ध्यानातच काही राहिना झालंय, आता हा विसरभोळा मंत्री झाला आहे.’ जरांगे पुढे म्हणाले, ‘तु 32 टक्के खातो, असा मंत्री देशात आहे का कुणी? आतापर्यंत याने आमचं आरक्षण खाल्लं आहे, तेच आम्ही परत घेत आहोत, गरीब ओबीसींनी हे समजून घ्यावे.’ जरांगेंनी आरक्षणाच्या मु्द्द्यावरुन म्हटले की, आरक्षण रद्द करायचं आहे का? तू इतके दिवस खात होता ते रद्द करायचं आहे का? तू प्रगत झाला आहे. तू ते आरक्षण सोड ना. तुझं अजूनही पोट भरत नाही का? भरत्या, शिक्षण, सगळं यानेच खाल्लं आहे. ओबीसींनी याचं ऐकू नये डोळे लाल दिसू नये म्हणून याने आज काळा चष्मा घातला आहे, याला आता यापुढे विसरभोळा मंत्री नाव द्यावे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

    मराठ्यांच्या मुंबईतील आंदोलनावरही भुजबळांनी टीका केली होती. याबद्दल विचारले असता जरांगे म्हणाले, देवाने अक्कल दिली असती तर बरं झालं असतं, मुंबईत मराठ्यांची पोरं गेली. महाराष्ट्राला एक संस्कृती दिसली. मुंबईचे जणू खरे मालकच ही पोरं होती, तिथले लोक पाहुणे आहेत. हा इथं शोभत नाही, या जनावराला नेपाळ, इकडे तिकडे सोडायला हवं, याला नागालँड, इंग्लंड अशा ठिकाणी सोडायला पाहिजे, असा घणाघात जरांगेंनी केला आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा