Nandurbar NCP Sharad Pawar Dispute : शहाद्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या मेळाव्यात, प्रदेशाध्यक्षांसमोरच अंतर्गत वाद उघडकीस आला आहे. एका पदाधिकाऱ्याने पक्षातील काही सदस्य भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप केला, तसेच एक जण भाजपच्या व्हॉट्सॲप ग्रुपचा ॲडमिन असल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपामुळे बैठकीत खळबळ उडाली, प्रदेशाध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत जाहीरपणे बोलणे टाळण्याचा सल्ला दिला.
शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच ते नंदुरबार जिल्ह्यात आले होते. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष तसेच आदिवासी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र वळवी यांनी बैठकीत जिल्हाध्यक्ष यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, फादर बॉडी सेलच्या पदाधिकाऱ्यांना योग्य सन्मान देत नाहीत. तसेच राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकारी आपल्या पक्षांमध्ये राहून आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश देत असतात. अनेक महिन्यांपासून नियुक्ती झाल्यानंतरही जिल्हाध्यक्षांनी काहीच हालचाल केलेली नाही त्यामुळे अनेकांनी पक्ष बदलला.
राज ठाकरे दादूकडे ‘मनसे’ मागणी करण्याच्या तयारीत; ठाकरेसेनेला धास्ती, खरंच होणार का युती?
वळवी यांनी सांगितले की, मी तयार केलेल्या सेलचे पदाधिकाऱ्यांना भाजपात प्रवेश देण्यासाठी आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनीच पुढाकार घेतला. आपल्या पक्षात राहून काही पदाधिकारी भाजपासाठी काम करतात. एक पदाधिकारी तर भाजपाचा व्हाट्सअप ग्रुपच्या ॲडमिन आहे. असे काम होत असेल तर पक्ष वाढणार कसा? असा सवाल करीत सभागृहात असलेले कार्यकर्त्यांना आणण्यात आले आहे, असा आरोप केला. राष्ट्रवादी पक्ष हा नंदुरबार जिल्ह्यात शिगेला असताना आता मात्र झिरो झाला असल्याचे सांगत गोपनीय पद्धतीने पक्षाचे काम सुरू असून अशामुळे पक्ष वाढणार नाही, असे यावेळी त्यांनी सांगितले. त्यांच्या आक्रमक भाषणानंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी त्यांचे कान टोचत या गोष्टी चार भिंतीच्या आड सांगितल्या असत्या तर बरं झालं असतं. असे सांगून फार वाढू नका असे सांगितले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीला भविष्य आहे त्यामुळे तिथे भांड्याला भांडे लागतात असे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. भविष्यात काही पक्ष संपणार असून राष्ट्रवादीचा उदय होणार आहे. राष्ट्रवादीच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले मात्र जनता तशीच राहिली. लोक पक्ष सोडून गेले शिल्लक आम्ही व तुम्हीच आहोत त्यातही एकमेकांच्या कार्यक्रम आम्ही करतोय असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार सुनील भुसारा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

