• Sat. Mar 7th, 2026
    मराठ्यांना खूश केलं, आता ओबीसींचा नंबर, देवेंद्र फडणवीस उद्या नागपुरात, पडद्यामागे जोरदार हालचाली

    ओबीसींची समजूत काढण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत सरकारने मराठा आरक्षणाबाबत नवा जीआर काढला. पण यामुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी नेत्यांची नाराजी दूर करण्याच्या तयारीत आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्य सरकारने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. हैदराबाद गॅझेटियरनुसार, ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या अंमलबजावणीस राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राज्य सरकारने याबाबत जीआरदेखील काढला आहे. पण यामुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी नेत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे. त्यासाठी ओबीसी नेत्यांचं साखळी उपोषण सुरु आहे. राज्यभरात ठिकठिकाणी ओबीसी नेत्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

    काही ठिकाणी ओबीसी संघटनांनी आंदोलन करताना मराठा आरक्षणाच्या जीआरची होळी केलेली बघायला मिळाली. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाचा जीआर फाडून टाकला. ओबीसींच्या या आक्रमक पवित्र्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कामाला लागले आहेत. ओबीसींची मनधरणी करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. याचबाबत महत्त्वाची माहिती समोर आली.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: उद्या नागपुरात ओबीसी आंदोलकांची भेट घेवून साखळी उपोषण सोडवणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषण सुरु असलेल्या ठिकाणी भेट देणार आहेत. देवेंद्र फडणवीस ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. त्यासोबतच मंत्री अतुल सावे हे देखील उद्या नागपूरला जावून ओबीसी आंदोलकांची भेट घेणार आहेत.

    ओबीसी आंदोलकांचं नागपुरात साखळी उपोषण सुरु आहे. त्यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री अतुल सावे हे देखील कामाला लागले आहेत. ओबीसी आंदोलकांची मनधरणी करण्याची मोठी जबाबदारी आता मंत्री अतुल सावे यांच्याकडे सुद्धा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अतुल सावे यांना ओबीसींची मनधरणी करण्यात यश येतं का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    ओबीसींच्या मागण्या नेमकं काय?

    • मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये.
    • मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये.
    • हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा अन्यायकारक निर्णय मागे घ्या.
    • ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 100 टक्के शिष्यवृत्ती द्या.
    • महाज्योती संस्थेकरता 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करा.
    • बार्टीप्रमाणे महाज्योती संस्थेची कामे ओबीसी प्रवर्गातील संस्थेला देऊन रोजगार द्या.
    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा