सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावाला पाण्याने वेढा घातला होता. शेकडो लोक पुराच्या पाण्यात अडकल्याने त्यांचा जीव टांगणीला आला होता. अशातच बचाव कार्यासाठी आलेले वर्दीतील जवान या संकटग्रस्तासाठी विघ्नहर्ता ठरले. पूरग्रस्त भागात जाऊन भारतीय सैन्य दल, एसडीआरएफ आणि सीआरपीएफच्या जवानांनी बचावकार्य करत अनेकांचे जीव वाचवले. शिवाय जवानांनी पुरात अडकलेल्या वयोवृद्धाना खांद्यावर उचलून सुरक्षितस्थळी हलविले. तसेच बोटीद्वारे पाण्यातून बाहेर काढून त्यांचा जीव देखील वाचवला. या संकट काळात जवानांनी केलेली मदत नागरिकांसाठी विघ्नहर्ता ठरली.नांदेड जिल्ह्यात 28 आणि 29 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस झाला. 16 पैकी तब्बल 13 तालुक्यात अतिवृष्टी नोंद झाली होती. जिल्ह्यातील नायगाव, कंधार, लोहा, धर्माबाद बिलोली, मुखेड आणि देगलूर या तालुक्यांना पावसाचा मोठा फटका बसला होता. 50हून अधिक गावामध्ये पूर आला, अनेक गावांचा संपर्क तुटला होता. शेकडो नागरिक पूरात देखील अडकले होते. दरम्यान पूर परिस्थिती पाहता छत्रपती संभाजीनगरहून 65 जवानाच्या तुकडीला बचाव कार्यासाठी पाचारण करण्यात आलं. शिवाय एसडीआरएफ आणि सीआरपीएफचे प्रत्येक ४० जवान तैनात करण्यात आले. बिलोली, मुखेड, देगलूर नायगाव यासह इतर तालुक्यातील पूरग्रस्त भागात जाऊन या जवानांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने रेस्क्यू करून शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. अतिशय जोखमीच्या ठिकाणी जवानांनी होडीच्या साह्याने तर, खांद्यावर घेऊन वयोवृध्दांना सुखरूप सुरक्षितस्थळी हलविले. शिवाय त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था देखील केली. भरपावसात आणि चिखलात जाऊन जवानांनी अनेकांचे जीव वाचवले.दरम्यान, यापूर्वी मुखेड तालुक्यातील हसणाळ, रावणगाव यासह पाच गावात ढगसदृश्य पाऊस आणि लेंडी धरणाच्या पाण्यामुळे पूर आला होता. हसणाळ आणि रावणगावात ही गावे पाण्याखाली आली होती. हसणाळ गावातील सहाजणांचा या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू देखील झाला होता. तेव्हा ही भारतीय सैन्यदल, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सीआरपीएफच्या जवानांची मोलाची मदत ठरली होती. जीव धोक्यात टाकून या जवानांनी कर्तव्य बजावत अनेकांचा सुरक्षित पाण्याबाहेर काढलं होतं. दोन ते तीन दिवस पूरग्रस्त भागात राहून त्यांनी मदत कार्य केलं होतं.
सैन्य दलाकडून पूरग्रस्त गावात मेडिकल कॅम्प
नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला. अनेक गावे बाधित झाली होती. पूर परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने सैन्य दलाला पाचरण केलं होतं. काल छत्रपती संभाजीनगर येथून सैन्य दलाची तुकडी नांदेडमध्ये दाखल झाली होती. सैन्य दलाने काल पुरात अडकलेल्यांना रेक्स्यू केलं. आज सकाळपासून बिलोली तालु्क्यातील हूनगुंदा येथे सैन्य दलाकडून मेडिकल कॅम्प लावण्यात आले होते. हूनगुंदा आणि संगमनेर या पूरग्रस्त गावकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली शिवाय त्यांना औषधोपचार देण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडून दोन्ही गावातील नागरिकांसाठी जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती.