• Sat. Jun 13th, 2026

    गरोदर महिलेला वेदना, रस्ताअभावी बांबूच्या झोळीने सात किमी प्रवास; रस्त्यातच प्रसुती

    ByMH LIVE NEWS

    Aug 27, 2025
    गरोदर महिलेला वेदना, रस्ताअभावी बांबूच्या झोळीने सात किमी प्रवास; रस्त्यातच प्रसुती

     नंदुरबार

              नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात बारमाही रस्ते नसल्यानं तेथील नागरिकांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम पिंपळखुटा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या वेहगीच्या बारीपाडा येथील गरोदर मातेला काल मंगळवारी रोजी प्रसुती वेदना होत होत्या. वेहगी बारीपाडा येथे जाण्यास पक्का रस्ता नाही. गावाच्या मधोमध येणाऱ्या देव नदीवर पूल नाही. तसेच वेहगी परिसरात मोबाईल रेंज नसल्यामुळे १०२ रुग्णवाहिकेला संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे गरोदर मातेला प्रसुती वेदना झाल्यानं मातेला झोळी करुन बांबूच्या साहाय्याने वेहगीच्या पालाहपाटी पाडा येथील मुख्य रस्त्यापर्यंत सुमारे सात किलोमीटर अंतरापर्यंत बांबूच्या झोळीनं आणण्यात आलं.

    मात्र, रस्त्यातच मातेची प्रसुती झाली. खासगी वाहनाच्या मदतीने पिंपळखुटा येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत ग्रामस्थांनी सांगितलं की, वेहगी गावात ते बारीपाडापर्यंत रस्ता व्हावा, यासाठी वारंवार संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आलं आहे. तसेच ३० सप्टेंबर २०२४ रोजी गावकऱ्यांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळीदेखील आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, ते अद्यापपर्यंत हवेतच विरले असल्याने येथील ग्रामस्थांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. याबाबत दिलीप पाडवी, जलपत तडवी, गीताबाई पाडवी, ईश्वर वळवी, विजयसिंग वसावे यांनी रस्त्यासाठी पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितली.

    अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील अनेक गाव पाड्यांवर जाण्यासाठी अद्यापही बारमाही रस्ते नाहीत. नद्यांवर पूल नसल्यामुळे आरोग्याचे प्रश्न, शिक्षण व ग्रामस्थांना गावपाडे गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन सर्व गावपाडे बारमाही रस्त्यांनी जोडण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे.

    महाराष्ट्रातलं धगधगतं वास्तव

    नदीवर पूल नाही आणि नदीच्या पलीकडे जाण्यासाठी पर्यायी व्यवस्थाही नाही… अशा स्थितीत नदीला पूर आलेला असल्याने मृतदेहाला दोरीच्या साह्याने दुसऱ्या बाजूला नेऊन अंत्यविधी करण्याची वेळ नागरिकांवर आली. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ग्रामपंचायत हद्दीमधील रोझवा प्लॉट येथील नागरिकांना हे दिव्य करावे लागले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed