• Wed. Jun 17th, 2026

    जीवदया, अध्यात्म भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 26, 2025
    जीवदया, अध्यात्म भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. २६ : भगवान महावीर यांनी नेहमी ज्या विचारांचा प्रचार केला, त्या विचारांमध्ये जीवदया व भूतदयेला सर्वोच्च स्थान आहे. आपण केवळ माणसासाठी नाही, तर सर्व सजीवांची काळजी घेत असतो. श्रीमद् राजचंद्र मिशनतर्फे प्राण्यांसाठी सुरू करण्यात येतअसलेले रुग्णालय हे मुंबईसाठी मोठे वरदान आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    पर्युषण महापर्वानिमित्त श्रीमद् राजचंद्र मिशन, धरमपूर यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पूज्य गुरुदेवश्री राकेशजी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जगातील इतर प्राचीन संस्कृती फक्त अवशेष रूपात उरल्या, परंतु भारतीय संस्कृती आजही जिवंत आहे. कारण आपण अध्यात्माचा कधीही त्याग केला नाही. पाश्चात्त्य विचारांमध्ये ‘सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट’ची संकल्पना आहे, पण आपल्या संस्कृतीत सर्वांसोबत, सर्व सजीवांना घेऊन जगण्याचा मार्ग भगवान महावीर यांनी दाखविला.

    जगात जेव्हा अध्यात्माची चर्चा होते तेव्हा भारताकडेच पाहिले जाते. श्रीमद् राजचंद्रजींसारख्या संतांनी विचारांद्वारे अनेकांना योग्य दिशा दाखवली. त्यांच्या प्रेरणेने समाजातील अनेक संस्था आणि कार्यकर्ते आजही निस्वार्थीपणे कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

    यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्रीमद् रामचंद्र प्राणी चिकित्सालयाच्या पायाभरणीचे पूजन करण्यात आले. हे प्राणी रुग्णालय मुंबईच्या मालाड येथे उभारण्यात येणार आहे.

    श्रीमद् राजचंद्र मिशनतर्फे 6 आणि 7 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील जियो वर्ल्ड गार्डन येथे युथ फेस्टिवल होणार आहे हा उत्सव युवकांना दिशादर्शक ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

    ०००

    संजय ओरके/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed