• Tue. Mar 10th, 2026

    Ratnagiri News : मनसेमधून कट्टर शिलेदाराची हकालपट्टी, राज कठोर होताच भाजपने डाव खेळला, पहिला फोन कोणी फिरवला?

    Ratnagiri News : मनसेमधून कट्टर शिलेदाराची हकालपट्टी, राज कठोर होताच भाजपने डाव खेळला, पहिला फोन कोणी फिरवला?

    Ratnagiri Vaibhhav Khedekar News : कोकणामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जुन्या शिलेदाराची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर आता भाजपने हा नेत्या आपला गळाला लावण्यासाठी फास टाकला आहे. दोन आमदारांनी थेट त्यांच्याशी संपर्क साधला, कोण आहेत ते आमदार जाणून घ्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रत्नागिरी, प्रसाद रानडे : कोकणात ऐन गणेशोत्सवातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वैभव खेडेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या केलेल्या हाकलपट्टीमुळे राजकीय धुळवड सुरू झाली आहे. हे पत्र मिळाल्यानंतर तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली आहे. गणेशोत्सवनंतर आता आपल्याला पुढील राजकीय भूमिका घ्यावी लागेल. माझ्या मनात तसं काहीच नव्हतं माझ्या बडतर्फीचे पत्र आल्यानंतर मला पहिला फोन मंत्री नितेश राणे यांचा आला मला अनेक भाजप पदाधिकाऱ्यांचेही फोन आले. त्यानंतर आमदार शेखर निकम यांनी फोन आला माजी आमदार संजय कदम यांचाही फोन आला. मला धीर देण्याचं काम केलं ही आमची कोकणातील राजकीय संस्कृती आहे. यावेळी पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खेडेकर यांच्या बडतर्फीच्या पत्रानंतर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत.

    “हे पत्र म्हणजे माझ्या निष्ठेचे सर्टिफिकेट”

    पक्ष तळागाळापर्यंत जावा पक्ष रुजावा आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार निवडून द्यावा ही भूमिका माझी होती. मी पक्षासाठी मंत्र्यांजवळही पंगा घेतला यामध्ये माझं खूप नुकसान झालं आणि हेच निष्ठेचे फळ मला मिळालं. राज साहेब तुम्ही हे पत्र काढायला घाई केलीत राज साहेब कालही मनात होतात आजही आहात हे सांगताना वैभव खेडेकर भावूक झाले होते. “सोशल मीडियावर बडतर्फीचे पत्र वाचले तेव्हा मन सुन्न झाले. हे पत्र म्हणजे माझ्या निष्ठेचे सर्टिफिकेट आहे. गेली १५ वर्षे खेड नगर परिषद माझ्या नेतृत्वाखाली मनसेच्या ताब्यात होती. मी पहिल्यांदाच थेट नगराध्यक्ष झालो. कोकणात पक्ष वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. कोविडच्या संकटातसुद्धा लोकांसोबत खंबीर उभा राहिलो. तरी मला संशयाच्या आधारे बडतर्फ केले गेले.”
    Maharashtra Timesराज ठाकरेंच्या भेटीसाठी अक्षरश: तरसले, पण पक्षाकडून हकालपट्टी, वैभव खेडेकरांनी मांडली कैफियत
    गेले दोन महिन्यात मला राज ठाकरे साहेबांची भेट मागत होतो पण मला भेट मिळाली नाही. आजचा पत्रावर ज्यांच्या सह्या आहेत तेही मला राज ठाकरे यांच्या भेटीसाठी प्रयत्न करत होते. पण त्यांनाही यश नाही आले. शिवसेना ते मनसे माझा तीस वर्षांचा प्रवास आहे, मनसे पक्ष वाढावा ही माझी धडपड होती पण हे माझ मनसे इंजिन आज थांबले आहे हे सांगताना वैभव खेडेकर हे भावनाविवश झाले. वैभव खेडेकर, खेड, रत्नागिरी. अविनाश सौंदळकर, राजापूर, रत्नागिरी. संतोष नलावडे, चिपळूण, रत्नागिरी. सुबोध जाधव, माणगाव, रायगड या पदाधिकाऱ्यांच्या यामध्ये समावेश आहे. आपण पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे, तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तुम्हाला पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे अशा स्वरूपाचे पत्र सोमवारी दुपारनंतर पक्षाकडून देण्यात आलं.
    Maharashtra TimesVaibhav Khedekar : भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु होताच राज ठाकरेंनी बाहेरचा रस्ता दाखवला, वीस वर्षांची साथ संपली, मनसे सरचिटणीस पक्षातून बडतर्फ

    माझा अपराध काय हे मला माहीत नाही?

    मला गेले दोन ते तीन महिने विनवण्या अर्जव करूनही मला राज साहेबांची भेट मिळू शकली नाही.मी कायम पक्षाशी एकनिष्ठ राहिलो पण माझा अपराध काय हे मला आजपर्यंत कळलं नाही.राज्यातील पहिली खेड नगरपरिषद जिंकून आणली. पक्षासाठी रात्रंदिवस धडपड केली, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत ते युवा मनसेच्या झेंड्याखाली लढलो तरी देखील मला बडतर्फ केलं. हीच का माझ्या निष्ठेची पोचपावती?”, असा सवाल खेडेकरांनी भावूक होत पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, आता वैभव खेडकर यांनी मांडलेल्या भूमिके नंतर आता ते पुढील काही दिवसात कोणती राजकीय भूमिका घेतात हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे कोकणात ऐन गणेशोत्सवातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले असून राजकीय धुळवड सुरू झाली आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा