Mumbai Bhaucha Dhakka Boat Accident: मुंबईत पुन्हा एकदा एका नेव्ही बोटीने प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई येथील भाऊचा धक्का येथून रेवस तसेच मोरा अशी जल प्रवास सेवा अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्वर नामक ही प्रवासी बोट मोरा जेट्टी येथून प्रवाशांना घेऊन मुंबईच्या भाऊच्या धक्क्याला निघाली होती. संत ज्ञानेश्वर नामक ही प्रवासी बोट मोरा बिकन आणि नेव्ही जेट्टीच्या दरम्यान आली असताना साडे आठ वाजण्याच्या सुमारास नेव्हीच्या स्पीड बोटीने या प्रवासी बोटीच्या कडेला धडक दिली. जर जी बोट समोरून अथवा मधोमध धडकली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. यावेळी प्रवासी बोटीतून केवळ दहा प्रवासी प्रवास करत होते. या अपघातानंतर प्रवाशांमध्ये घबराट आणि गोंधळ उडाला होता.
Mumbai Local आता सुसाट, तब्बल 15 ठिकाणी वेगमर्यादा हटवली, प्रवाशांना होणारा विलंब टळणार
नेव्हीच्या बोटी बेदरकारपणे समुद्रात फिरत असतात. त्यांना याबाबत कोणी जाब विचारला तर ते दादागिरी करतात आणि कुणालाही जुमानत नाहीत. डिसेंबर 2024 ला अशाच प्रकार निलकमल बोटीला नेव्हीच्या स्पीडबोटीने धडक दिली होती. या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला होता. कालच्या घटनेने पुन्हा एकदा या अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. याबाबत मुंबईच्या यलोगेट पोलीस ठाण्यात प्रवासी बोट मालकाने तक्रार केली आहे.
शुक्रवारी रात्री मोरा येथून सुटणाऱ्या शेवटच्या लाँचला नेव्हीच्या जेट्टीजवळ नेव्हीच्या स्पीड बोटीने धडक दिली. या प्रवासी बोटीत 10 प्रवासी होते. सुदैवाने यामध्ये कुणालाही इजा झाली नाही. मात्र, प्रवासी बोटीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर प्रवाशांना घेऊन ही बोट भाऊच्या धक्का सुरक्षितपणे आणण्यात आली. असल्याची माहिती बंदर अधिकारी सुशिल सातेलकर यांनी दिली आहे.

