• Sat. Mar 7th, 2026
    नांदेडात पाऊस ठरतोय काळ! ढगफुटी सदृश्य पावसाचा कहर, चहूकडे हाहाकार; ११ जणांचा अंत

    Nanded Rain Havoc : नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस सुरु आहे. लेंडी धरणातून पाण्याचा विसर्ग आणि उदगीर भागातून आलेल्या पाण्यामुळे सहा गावे पुराने वेढले आहेत. हसनाळ आणि तेलंगणातील मिळून नऊ जण बेपत्ता झाले होते, त्यापैकी आतापर्यंत आठ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, तर जिल्ह्यातील मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यात काही गावांवर रविवारी रात्री आभाळच कोसळले होते. ढगफुटी सदृश्य पाऊस, लेंडी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आणि उदगीर भागातून येणारे पाणी यामुळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातील सहा गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. हसनाळामधील पाच व तेलंगाणातील चार असे नऊ जण बेपत्ता झाले होते. सोमवारी सायंकाळपर्यंत तीन आणि आज मंगळवारी सायंकाळ पर्यंत पाच जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहे. मृतकांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. दरम्यान आणखी दोन जण बेपत्ता असून त्यांचं शोधकार्य सुरू आहे.

    हसनाळमध्ये बेपत्ता झालेल्या पाच पैकी भीमाबाई मादाळे, गंगाबाई मादाळे व ललिताबाई भोसले यांचा मृतदेह सोमवारी सायंकाळपर्यंत हाती लागला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी गावातील पिराजी म्हैसाजी थोटवे, चंद्रकला विठ्ठल शिंदे यांचा मृतदेह हाती लागला आहे. यावेळी नातेवाईकांनी हे सारे प्रशासकीय बेजबाबदारपणाचे बळी असल्याची संतप्त भावना व्यक्त केली आहे आणि एकच अक्रोश केला.
    Maharashtra Timesमोनोरेल एका बाजूला झुकली, मुंबईवर मोठं संकट, अग्निशामक दलाकडून रेस्क्यू सुरु
    मुखेड -उदगीर तालुक्याच्या सीमेवरील धडकनाळ येथील पुलावरून सोमवारी रात्री १.४० वाजता ४ पुरुष, ३ महिला हे १ कार आणि १ ऑटो सहित वाहून गेले होते. त्यांचा बचाव पथकाकडून शोध सुरु होता. त्यापैकी ३ पुरुषांना स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत वाचविण्यात आले आहे. दरम्यान बेपत्ता असलेल्या महबूब अहमद साहेब गोंडगावकर (वय ३२ रा. गोंडगाव ता. देगलूर), हसीना अब्दुल पाशा शेख (वय ३२ रा. जकैळ, तेलंगणा) आणि समीना रशीद शेख (वय ४५ रा. जकैळ, तेलंगाणा) या तिघांचे मृतदेह सापडले आहेत. आणखी दोन जण जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. या अस्मानी संकटामुळे मुखेड तालुक्यात मृतकांची संख्या आठ पर्यंत पोहचली आहे. तर पुरामुळे नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो जनावरे देखील दगावली आहे. लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

    मंगळवारी सायंकाळी मंत्री गिरीश महाजन यांनी मुखेडमध्ये पोहोचत नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. या संकटामुळे मुखेड तालुक्यातील हासनाळ, भोंगोली, भेंडेगाव, सांगवी भादेव, रावणगाव, भासवाडी या गावाला मोठा फटका बसला आहे. शेकडो कुटुंबीयांचे संसार उघड्यावर पडले आहेत. आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय सैन्य दलाचे ७२ जवानांनी पूरग्रस्त भागात जाऊन मदतकार्य सुरु केले. अनेकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. सैन्य दलाचे ७२, राज्य आपत्ती दलाचे ४४ आणि क्युआरटीच्या ३० जवनांकडून बचावकार्य सुरु आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा