Beed Rain Update: मध्यरात्री ही चार चाकी गाडी गावा जवळील नदीपात्रात पाण्याच्या प्रवाहात अडकली होती. यातील तीन लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात ग्रामस्थ आणि प्रशासनास यश आलं. तर, एकाचा मृत्यू झाला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस
बीड जिल्ह्यात मागच्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील कौडगाव हुडा गावाजवळील नदीपात्रातून जाताना चारचाकी वाहन पाण्याच्या प्रवाहात अडकल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (18 ऑगस्ट) पहाटे घडली असल्याचं समोर आलं आहे.
Parbhani Rain: परभणीला पावसाने झोडपलं, नद्यांना पूर, येलदरी धरणाचे दहा दरवाजे उघडले, अलर्ट जारी
तीन जणांचा वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू
यामध्ये तीन नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात स्थानिक नागरिक आणि प्रशासनास यश आले आहे. मात्र, अद्यापही एक प्रवाशी पाण्यात अडकला होता. त्याचा शोध घेण्यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करीत होते. अनेक तासांच्या शोधानंतर अखेर त्या युवकाचा मृतदेह सापडला आहे.या घटनेत अमर मधुकर पोळ (वय 22 रा डिग्रस), राहुल संपत्ती पोळ (वय 32 रा डिग्रस), राहुल सटवजी नवले (वय 22 रा फुलरवाडी ता पाथरी) यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
सततच्या पावसामुळे नदीला पूर
सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे नदीला आलेल्या पुराचा वेग मोठा आहे. घटनास्थळी एसडीओ, डीवायएसपी, तहसीलदार तसेच पोलिस अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते. मात्र, शेवटी त्याचा मृतदेह शोधण्यात प्रशासनास यश आले. मृत तरुणाचा मृतदेह शासकीय रुग्णालय सिरसाळा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येत आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात येईल.
सध्या संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील मोठ्या शहरांसह जवळपास संपूर्ण राज्यात पाऊस सुरु आहे. त्यामुळे नद्या नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. तर, कुठे पूरस्थिती उद्भवल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.

