Maharashtra Rain Update : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहा:कार बघायला मिळतोय. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासन युद्ध पातळीवर मदतीचं काम करत आहे. पण या मुसळधार पावसाने अनेकांना धडकी भरली आहे. असं असलं तरीही काही जिल्ह्यांमध्ये तितका पाऊस पडत नाहीय हे देखील वास्तव आहे.
मांजरा प्रकल्प सध्या 90 टक्के क्षमतेने भरलं आहे. पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने चार दरवाजे उघडले आहेत. याद्वारे 0.25 मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात 3494.28 क्यूसेक्स (98.96 क्यूमेक्स) इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.
नदीकाठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा
मांजरा धरण प्रवण क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सतत पडत असणारा पावूस, धरण क्षेत्रात साठलेला पाणीसाठा आणि आगामी चार दिवसांत पडणाऱ्या पावसाचा देण्यात आलेला इशारा लक्षात घेता, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजी नगर विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी लातूर पाटबंधारे विभाग यांच्यामार्फत कार्यालयीन आदेश काढून नदीकाठच्या गावांना आणि नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान मांजरा नदी काठावरील गाव, पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे. कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये आणि कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पूर नियंत्रण कक्ष मांजरा प्रकल्प धनेगाव यांच्या वतीने करण्यात आलं आहे.
हिंगोलीत कयाधू नदीने ओलांडली धोक्याची पातळी
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात असलेल्या कयाधू नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गावामध्ये नदीचे पाणी शिरल्याने जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहार आणि इतर साहित्य हलवण्यात आले आहे. त्याचबरोबर शेवाळा गावांमध्ये देखील पुराची परिस्थिती निर्माण झाल्याने पुराचे पाणी गावात शिरले आहे. सध्या कयाधू नदी पात्राने धोक्याची पातळी ओलांडली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
वाशिम जिल्ह्यात काल रात्री पासून मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे. मागील एका तासापासून संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील किनखेडा, एरंडा, सोनखस, कळंबा महाली यासह अनेक गाव परिसरात आज दुपारी ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. त्यामुळे गावाला तलावाचे स्वरूप आले. गावात सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे. अनेक घरांमध्येही पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. यामुळे घरगुती साहित्याचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरीत मुसळधार पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाने परशुराम घाटाखाली असलेल्या पेढे गावात घरामध्ये पाणी शिरले आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटाखाली वसलेल्या पेढे गावातील पाणकर वाडीत संतोष देवजी फके यांच्या घरात पाणी शिरलं आहे. यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र या सगळ्या परिस्थितीकडे महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

