• Thu. Jun 18th, 2026

    मनपाच्या ‘पीएम श्री’ शाळेला मिळणार १० कोटी रुपये – तिरंगा रॅलीमध्ये पालकमंत्री डॉ. अशोक उईकेंनी दिली ग्वाही – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 16, 2025
    मनपाच्या ‘पीएम श्री’ शाळेला मिळणार १० कोटी रुपये – तिरंगा रॅलीमध्ये पालकमंत्री डॉ. अशोक उईकेंनी दिली ग्वाही – महासंवाद

    बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले उच्च माध्य. व प्राथ. शाळेत आयोजन

    चंद्रपूर, दि. 16 : शहरातील बाबुपेठ येथे चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे चालविण्यात येणा-या पीएम श्री सावित्रीबाई फुले उच्च माध्य. व प्राथ. शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळत असल्याने येथे शाळा प्रवेशाचा ओढा दिवसेंदिवस वाढतच आहे. सजग पालक आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेशित करीत असून शाळेच्या पायाभूत सुविधा आणि गुणवत्तापूर्वक शिक्षणामध्ये वाढ होण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

    ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत बाबुपेठ येथील पीएम श्री शाळेत आयोजित तिरंगा रॅलीमध्ये ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त संदीप चिद्यावार, शाळेचे मुख्याध्यापक श्री. नीत आदी उपस्थित होते.

    पालकांनी विश्वास दर्शवून आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेश दिला आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, विद्यार्थ्यांना आणखी गुणवत्तापूर्वक शिक्षण आणि सुसंस्कृत नागरिक घडविण्याची जबाबदारी येथील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचा-यांवर आहे. आपला विद्यार्थी कसा पुढे जााईल, त्याच्यातील सुप्त कलागुणांना कसे विकसीत करता येईल, हेच शिक्षकांचे ध्येय असायला पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांच्या चेह-यावर नेहमी हास्य राहिले पाहिजे. या शाळेचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून येथे वर्गखोल्या, फर्निचर, आधुनिक लॅब, डीजीटलायझेशन, क्रीडांगण आदींसाठी खनीज विकास निधीतून 10 कोटी रुपये त्वरीत देऊ. त्यासाठी या महिन्याअखेर कृती आराखडा सादर करावा. पुढील महिन्यात प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही पालकमंत्री डॉ. उईके यांनी आश्वस्त केले.

    आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, बाबुपेठ परिसरात सामान्य कष्टकरी वर्गाचे वास्तव्य आहे. महानगर पालिकेच्या वतीने अतिशय सुंदर आणि गुणवत्तापूर्वक शाळा चालविली जात आहे. 1100 विद्यार्थी असलेल्या या शाळेसाठी 36 वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. मात्र सद्यस्थितीत 20 वर्गखोल्या असून शाळेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच मनपाच्या वतीने चालविण्यात येणा-या दोन शाळांचासुध्दा याच धर्तीवर विकास करावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. राज्य शासनाच्या सुचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅलीचा अतिशय चांगला उपक्रम शाळेने आयोजित केला, त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिका, सर्व अधिकारी आणि शिक्षक अभिनंदनास पात्र आहे, असेही त्यांनी सांगितले.

    प्रास्ताविकात आयुक्त विपीन पालिवाल म्हणाले, आपल्याला स्वातंत्र किसे मिळाले, आपल्या पुर्वजांनी ब्रिटीशांविरुध्द कसा लढा दिला, सोबतच हुतात्म्यांचे बलिदान आदी बाबींची माहिती जनतेला मिळावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ हे अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत शाळेमध्ये रांगोळी, चित्रकला, पत्रलेखन, राखी स्पर्धा घेण्यात आल्या. यावर्षी चंद्रपूर महापालिकेच्या वतीने 10 हजार झेंड्यांचे वितरण करण्यात आले आहे. 2012 मध्ये शाळेत केवळ 70 विद्यार्थी होते आज ही संख्या  1100 वर पोहचली आहे. शाळेत केवळ संख्यात्मक वाढ नाही तर गुणात्मक शिक्षणावर भर देण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले.

    यावेळी मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून तिरंगा रॅलीला रवाना करण्यात आले. ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली बाबुपेठ परिसरातून काढण्यात आली.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed