• Fri. Mar 6th, 2026
    घरकुलच्या रकमेची वाट पाहतच जगाचा निरोप, नव्या घराचं स्वप्न अधुरं, घराची भिंत कोसळून ग्रामपंचायत आजी-माजी सदस्य दाम्पत्याचा मृत्यू

    Nanded Grandparents die in their Sleep After Wall Collapses : नांदेडमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. घरात झोपलेले असताना एका वयस्कर दाम्पत्यावर घराची भिंत कोसळ्याने त्यांचा झोपेतच मृत्यू झाला आहे. या घटनेनं नांदेडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

    नांदेड भिंत कोसळून दाम्पत्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड : सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे घराची भिंत कोसळून अंगावर पडल्याने ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सदस्य असलेल्या दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कोटबाजार येथे काल शुक्रवारी मध्यरात्री ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. शेख नासेर अमीन आणि हसिना बेगम शेख नासेर असं मयताची नावं आहेत. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

    नांदेड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मागील तीन दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. कंधार तालुक्यात ही पावसाची परिस्थिती कायम आहे. हसीना बेगम शेख नासेर ह्या कोटबाजार ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या आहेत. तर त्यांचे पती शेख नसेर अमीन हे माजी सदस्य आहेत. कच्चा इटकरी आणि पत्राच्या घरात दोघेजण राहत होते. काल शुक्रवारी रात्री घरात झोपले होते. रात्री १२ वाजेच्या सुमारास घराची भिंत त्यांचा अंगावर कोसळली. पत्रावरील दगडामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळाली.

    Maharashtra TimesBeed News : बीड जिल्हा शासकीय रुग्णालयाचा छताचा कोसळला भाग, आठवड्यापूर्वीच दादांचा झालेला दौरा, आता काय परिस्थिती?

    गावकऱ्यांनी प्रशासनाला तात्काळ घटनेची माहिती दिली. विशेष म्हणजे घरकुलसाठी या आजी-माजी सदस्यांनी अर्ज केला होता. तीन महिन्यापूर्वी घरकुल मंजूर झालं, पण शासनाकडून हप्ता काही मिळाला नाही, त्यामुळे घरकुलाचं काम रखडल होतं. परिणामी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिला सदस्याला आपल्या कुटुंबियासोबत पत्राच्या घरात रहावं लागत होतं. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पती पत्नीला जीव गमवावा लागला, असा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. या घटनेनं कंधार तालुक्यात शोककळा पसरली आहे.

    Maharashtra TimesAjit Pawar : ‘दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसायची गरज नाही’, रोहित पवारांच्या टिकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर

    शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. शुक्रवारी २७ मंडळात अतिवृष्टी झाली होती. अनेक ठिकाणचा संपर्क तुटला होता. दरम्यान, शनिवारी पहाटेपासून पुन्हा दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. मागील चौवीस तासात चार मंडळात अतिवृष्टी झाली आहे. अनेक सखल भागात पाणी साचले होते. दरम्यान विष्णुपुरी प्रकल्पाचे दोन आणि इसापुर धरणाच्या चार दरवाजे उघडून नदीत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. किनवट तालुक्यातील बोधडी मध्ये नाल्याच्या पुरात शाळेची बस वाहून गेली. सुदैवाने यात एकही विद्यार्थी नव्हता. चालक प्रेमसिंग पवार हे बेपत्ता असल्याची माहिती आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात.… आणखी वाचा