• Mon. Mar 9th, 2026
    Nashik News: शेती, कृषिउद्योगाला ‘खो’; माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलामुळे नाशिक पुन्हा दुर्लक्षित

    Nashik News: माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने नाशिकला कृषिमंत्रिपद मिळाल्याने नाशिकमधील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

    manikrao kokate (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: विधान परिषदेत रमी खेळल्यामुळे वादात सापडलेल्या ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याकडील महत्त्वाचे कृषी खाते दत्तात्रय भरणे यांच्याकडे गेले आहे. त्यामुळे नाशिकसाठी महत्त्वाचे असलेले कृषिखाते आता पुणे जिल्ह्याकडे गेले आहे. याचा नाशिक जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. कोकाटे यांनी नऊ महिन्यांत नाशिकसाठी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांनाही आता ‘खो’ बसण्याची शक्यता आहे.

    महायुती सरकारमध्ये नाशिकला प्रथमच एकाचवेळी चार मंत्रिपदे मिळाली होती. त्यात राष्ट्रवादीचे तीन मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाला एक मंत्रिपद मिळाले. त्यामुळे अनेक वर्षांपासून उपेक्षित राहिलेल्या नाशिकच्या विकासाचा वनवास संपेल, अशी अपेक्षा होती. त्यातही कृषिमंत्रिपदासारखे महत्त्वाचे खाते नाशिकला मिळाले. नाशिक हा कृषिप्रधान जिल्हा आहे. येथे भाजिपाला, द्राक्ष, डाळिंब, कांदा या पिकांसाठी धोरणात्मक निर्णय होऊन निर्यातीला चालना मिळेल, अशी अपेक्षा होती.
    महापालिकेच्या 25 वर्षीय कंत्राटी कर्मचाऱ्याला निर्घृणपणे संपवलं; जीव गेल्यानंरतही थांबले नाहीत, दगडाने…
    नाशिकमध्ये शेतीला ‘अच्छे दिन’ येऊन कृषिप्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल, अशी अपेक्षा होती. कोकाटे यांनी कृषिमंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील कृषी केंद्राना भेटी देऊन शेतकरी आणि शेतीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत निर्णय घेण्याचा धडाका लावला होता. परंतु, एकीकडे काम करताना कोकाटे यांनी अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्य करून घेतलेल्या निर्णयांवर पाणी फेरले. त्यात विधिमंडळात रमी खेळतानाचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा फटका कोकाटेंना बसला. त्यांच्याकडील कृषिखाते दत्तात्रय भरणे यांच्याकडे, तर भरणेंकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार कोकाटेंकडे देण्यात आला आहे. कोकाटेंचे मंत्रिपद वाचले असले तरी, त्यांच्याकडील कृषिमंत्रिपद गेल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आणि शेती क्षेत्राची अपरिमीत हानी झाल्याची प्रतिक्रिया आता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
    Nashik Simhastha Kumbh Mela: कर्जमंथनातून सिंहस्थ कुंभ! नाशिक महापालिका काढणार ५७५ कोटी रुपयांचे कर्ज
    मी नाराज नाही
    ‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे. दत्तात्रय भरणे हे शेतकरी पुत्र आहेत, त्यांच्याकडे खाते दिल्याने न्याय होईल. दत्तामामा भरणे यांना काही मदत लागली, तर मी करेल. मला काही मदत लागली, तर त्यांचा सल्ला घेणार. मी अजिबात नाराज नाही,’ अशी प्रतिक्रिया कोकाटे यांनी खाते बदलल्यानंतर व्यक्त केली. ‘मी नव्या विभागातही अतिशय उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करणार आहे,’ असा विश्वास कोकाटे यांनी व्यक्त केला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा