• Sun. Mar 15th, 2026
    नव्या कृषिमंत्र्यांनी महसूल दिनाच्या दिवशी अधिकाऱ्यांना दिला अजब सल्ला, भरणे सुरुवातीलाच अडकणार?

    Dattatraya Bharane : कृषीमंत्रिपदाची धुरा दत्तात्रय भरणेंकडे जाताच त्यांनी केलेल्या एक विधानामुळे मात्र ते वादात सापडण्याची शक्यता आहे. महसुलदिनी केलेल्या या विधानामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    पुणे : राज्याचे नवे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे केलेल्या भाषणात एक अजब सल्ला दिल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत. महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटले की, ‘सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात,’ या विधानामुळे कार्यक्रमाला उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये क्षणभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

    महसूल दिनासारख्या गंभीर प्रसंगी कृषीमंत्र्यांचे असे भाष्य अनेकांना पचनी पडले नसावे, असे चित्र आहे. महसूल विभागाकडून पारदर्शकता आणि प्रामाणिक सेवा अपेक्षित असताना, मंत्र्यांनी ‘काम वाकडं करून परत सरळ करण्याचा’ सल्ला दिल्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
    Ajit Pawar Politics : माणिकरावांचं मंत्रिपद वाचलं अन्….; अजित दादांनी एकाच दगडात दोन पक्षी कसे मारले? वाचा A टू Z
    दत्तात्रय भरणे यांनी पुढे शेतकऱ्यांच्या तक्रारींना वेळीच न्याय मिळावा आणि योजनांचा लाभ योग्य हक्कदारांपर्यंत पोहोचावा, असेही नमूद केले. मात्र त्यांना नव्या मंत्रिपदाची धुरा मिळताच अशा अजब विधानामुळे मंत्री महोदय अडचणी येण्याची शक्यता आहे.

    स्थानिक पातळीवर या वक्तव्यामुळे वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे. तसेच राज्य पातळीवर देखील पडसाद उमटू शकतात. माणिकराव कोकाटेंनंतर आता दत्तात्रय भरणेंनी वादग्रस्त विधान केल्याने कोणती नवी घडामोडी घडणार पाहणे महत्वाचे असणार आहे.

    दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांत राजकीय पटलावर अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. वादग्रस्त विधान आणि प्रकरणांमुळे महायुतीतील अनेक नेते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यामुळे काहींना डच्चू मिळणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याची सुरुवात माणिकराव कोकाटेंपासून झाल्याचे चित्र आहे. पण कोकाटेंचे मंत्रिपद काढण्यात आले नसून त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे बाकीच्या वादग्रस्त मंत्र्यांचीही धाकधूक वाढणार आहे. यातच आता भरणेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात काय घडतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा