• Wed. Mar 18th, 2026

    भागवतांना धरुन आणण्याचे आदेश होते! परमबीर सिंहांचं नाव घेत माजी ATS अधिकाऱ्याचा सनसनाटी दावा

    भागवतांना धरुन आणण्याचे आदेश होते! परमबीर सिंहांचं नाव घेत माजी ATS अधिकाऱ्याचा सनसनाटी दावा

    Malegaon Bomb Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोटातील सात आरोपींची एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्याअभावी न्यायालयाने हा निर्णय दिला. एटीएसचे माजी पोलीस निरीक्षक महिबूब मुजावर यांनी तपास खोटा असल्याचा दावा केला. तत्कालीन एटीएस प्रमुख परमबीर सिंह यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील सातही आरोपींची विशेष एनआयए न्यायालयानं आज सुटका केली. सबळ पुरावे नसल्यानं न्यायालयानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणातील आरोपींच्या विरोधात यूएपीए अंतर्गत खटला चालवण्यात आलेला होता. दहशतवादी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र न्यायालयानं आज सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी एटीएसचे माजी पोलीस निरीक्षक महिबूब मुजावर यांनी अनेक सनसनाटी दावे केले आहेत. पहिल्यांदाच माध्यमांसमोर आलेल्या मुजावर यांनी तत्कालीन एटीएस प्रमुख परमबीर सिंह यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत.

    २००८ मध्ये मालेगावात झालेल्या बॉम्ब स्फोट प्रकरणातील साक्षीदार असलेले महिबूब मुजावर यांनी माध्यमांसमोर येऊन अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. ‘हा तपास खोटा आहे. लोकांना त्यात गोवण्यात आलेलं आहे. रामजी कलसांग्रा, संदीप डांगे आणि दिलीप पाटीदार यांचा खून करण्यात आलेला असताना ते जिवंत आहेत म्हणून दोषारोप पाठवण्यात आलं आणि त्याचा तपास करण्यासाठी मला नेमलं होतं. ज्याला मारलेलं आहे, जे मेलेले आहेत, ते जिवंत आहेत हे दाखवण्यासाठी मला त्यांच्या घरी जाऊन धाडी टाकायला सांगितल्या. हे सगळं खोटं असल्याचं माझ्या लक्षात आलं. या सगळ्यात आपला वापर करण्यात येत असल्याचंही माझ्या ध्यानात आलं होतं,’ असं मुजावर यांनी सांगितलं.

    malegaon trend (1)

    ‘मला एक गोपनीय आदेशसुद्धा देण्यात आला होता. आदरणीय मोहन भागवत यांना धरुन आणा असा आदेश होता. अटक करुन आणा, असा आदेश नव्हता. धरुन आणा हा शब्द होता. त्यामुळे मी ते केलं नाही. तपास झाल्यानंतर यांच्या (माझ्या वरिष्ठांच्या) लक्षात आलं की या सगळ्या गोष्टी याला माहीत आहेत. मग याचं काय करायला हवं? यानं काम तर केलेलं नाही. पाहिजे ते काम याच्या हातून झालेलं नाही. मग त्यांनी माझ्यावर खोटे गु्न्हे दाखल केले. त्यात मला अटक केली. मग सात-आठ वर्ष मी त्या प्रकरणात अडकून गेलो आणि त्यातून मी निर्दोष सुटलो,’ असा घटनाक्रम मुजावर यांनी कथन केला.

    malegaon case

    ‘निर्दोष सुटताना सीआरपीसीच्या कलम ३१३ च्या अंतर्गत मी जबाब दिला. त्यात मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तीच कागदपत्रं यांनाही (आज निकाल लागलेल्या प्रकरणात) पुरवण्यात आली. न्यायालयानं निकालात नेमका कशाचा उल्लेख केला याची मला कल्पना नाही. त्यावेळी परमबीर सिंह एटीएसचे प्रमुख होते. ते दररोज मला सूचना देत होत्या. त्यानुसार मी काम करत होतो आणि दररोज त्यांना फिडबॅक देत होतो,’ असं मुजावर म्हणाले. आज न्यायालयानं दिलेल्या निकालाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा