Malegaon Bomb Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोटातील सात आरोपींची एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्याअभावी न्यायालयाने हा निर्णय दिला. एटीएसचे माजी पोलीस निरीक्षक महिबूब मुजावर यांनी तपास खोटा असल्याचा दावा केला. तत्कालीन एटीएस प्रमुख परमबीर सिंह यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले.
२००८ मध्ये मालेगावात झालेल्या बॉम्ब स्फोट प्रकरणातील साक्षीदार असलेले महिबूब मुजावर यांनी माध्यमांसमोर येऊन अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. ‘हा तपास खोटा आहे. लोकांना त्यात गोवण्यात आलेलं आहे. रामजी कलसांग्रा, संदीप डांगे आणि दिलीप पाटीदार यांचा खून करण्यात आलेला असताना ते जिवंत आहेत म्हणून दोषारोप पाठवण्यात आलं आणि त्याचा तपास करण्यासाठी मला नेमलं होतं. ज्याला मारलेलं आहे, जे मेलेले आहेत, ते जिवंत आहेत हे दाखवण्यासाठी मला त्यांच्या घरी जाऊन धाडी टाकायला सांगितल्या. हे सगळं खोटं असल्याचं माझ्या लक्षात आलं. या सगळ्यात आपला वापर करण्यात येत असल्याचंही माझ्या ध्यानात आलं होतं,’ असं मुजावर यांनी सांगितलं.
‘मला एक गोपनीय आदेशसुद्धा देण्यात आला होता. आदरणीय मोहन भागवत यांना धरुन आणा असा आदेश होता. अटक करुन आणा, असा आदेश नव्हता. धरुन आणा हा शब्द होता. त्यामुळे मी ते केलं नाही. तपास झाल्यानंतर यांच्या (माझ्या वरिष्ठांच्या) लक्षात आलं की या सगळ्या गोष्टी याला माहीत आहेत. मग याचं काय करायला हवं? यानं काम तर केलेलं नाही. पाहिजे ते काम याच्या हातून झालेलं नाही. मग त्यांनी माझ्यावर खोटे गु्न्हे दाखल केले. त्यात मला अटक केली. मग सात-आठ वर्ष मी त्या प्रकरणात अडकून गेलो आणि त्यातून मी निर्दोष सुटलो,’ असा घटनाक्रम मुजावर यांनी कथन केला.
‘निर्दोष सुटताना सीआरपीसीच्या कलम ३१३ च्या अंतर्गत मी जबाब दिला. त्यात मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तीच कागदपत्रं यांनाही (आज निकाल लागलेल्या प्रकरणात) पुरवण्यात आली. न्यायालयानं निकालात नेमका कशाचा उल्लेख केला याची मला कल्पना नाही. त्यावेळी परमबीर सिंह एटीएसचे प्रमुख होते. ते दररोज मला सूचना देत होत्या. त्यानुसार मी काम करत होतो आणि दररोज त्यांना फिडबॅक देत होतो,’ असं मुजावर म्हणाले. आज न्यायालयानं दिलेल्या निकालाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.

