Bachchu Kadu on Ajit Pawar : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात जावून भेट घेतली. अजित पवार आज माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेणार असल्याची चर्चा होती. माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालयात जावून अजित पवारांची भेट घेतल्यानंतर, त्यांनी आपली बाजू मांडली. यानंतर सध्याच्या घडामोडी पाहता माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा टळलेला दिसतोय. यावरुन बच्चू कडू यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली आहे.
माणिकराव कोकाटे यांनी आज मंत्रालयात जावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मंत्रालयात अजित पवार यांच्या केबिनमध्ये जावून माणिकराव कोकाटे यांनी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांची बाजू समजून घेतली. कृषी खात्यामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची माणिकराव कोकाटे यांच्याबाबत कोणतीही तक्रार नसल्याची माहिती येत आहे. तसेच अजित पवार यांनी या बैठकीत माणिकराव कोकाटे यांना समज दिल्याची माहिती आहे.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतल्यानंतर त्यांनी दुपारनंतर पुन्हा त्यांची भेट घेतली. माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जावून अजित पवारांची पुन्हा भेट घेल्याची माहिती आहे. या सगळ्या घडामोडी पाहता माणिकराव कोकाटे यांना पुन्हा एक संधी देण्यात आल्यासारखी स्थिती आहे. पण यावरुन प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे. बच्चू कडू यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना अजित पवार यांच्यावर टीका केली.
बच्चू कडू काय म्हणाले?
“काय गेम फसलाय मला माहिती नाही. एकतर माणिकराव कोकाटे यांच्याकडे अजित दादांच्या काही गोष्टी लपल्या असतील म्हणून ते धाडस करत नाहीत. अजित दादांची दादागिरी आजकाल चालत नाहीय. सरकारमध्येही चालत नाही. त्यांच्या पक्षामध्येही चालत नाही, असं दिसत आहे. दोन-तीन गोष्टी तपासल्या तर त्यांचं कोणी ऐकत नाही तेच दिसतंय”, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.

