• Wed. Mar 11th, 2026

    विमा संस्थांनी जनजागृती, विश्वासार्ह सेवांवर भर द्यावा – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आवाहन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 25, 2025
    विमा संस्थांनी जनजागृती, विश्वासार्ह सेवांवर भर द्यावा – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आवाहन – महासंवाद

    मुंबई, दि. २५ : विमा हा केवळ आर्थिक उत्पादन नसून तो सामाजिक सुरक्षा, जोखीम व्यवस्थापन आणि आर्थिक स्थैर्य यासाठी अत्यावश्यक साधन आहे. भारतीय विमा ब्रोकर संघटनेसारख्या संस्थांनी नागरिकांना केवळ विमा पॉलिसीची विक्री न करता जनजागृती, सुलभ माहिती आणि विश्वासार्ह सेवा देण्यावर भर द्यावा, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

    कफ परेड येथे भारतीय विमा ब्रोकर संघटनेच्या (आयबीएआय) रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्थापना दिन कार्यक्रमात राज्यपाल श्री. राधाकृष्णन बोलत होते. भारतीय विमा ब्रोकर संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रकुमार भरिंदवाल, राज्यपालांचे उपसचिव एस. रामामूर्ती, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणचे सदस्य सत्यजित त्रिपाठी, विमा समितीच्या सदस्या श्रीमती टी.एल. अलामेलू, आयबीएआयचे उपाध्यक्ष मोहन एस, सचिव निर्मल बजाज आदींसह शासकीय व नियामक संस्थांचे वरिष्ठ अधिकारी, विमा व वित्तीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

    राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले की, ही संस्था रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्याने हा आनंदाचा क्षण आहे. विमा दलाल (ब्रोकर) हे विमाधारक व विमा कंपनी यांच्यातील दुवा आहेत. ते ग्राहक केंद्रित आणि उपयोगी उपाय सूचवितात. भारत देश पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे, त्यामध्ये कॉर्पोरेट विमा सेवांचे महत्व अधोरेखित होते. ते सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राच्या विमा उद्योगातील विस्ताराशीही संबंधित आहेत. हे सर्व राष्ट्रीय प्राधान्याचे विषय असून सुरक्षिततेची व्याप्ती आणि परस्पर सहकार्य विमा क्षेत्रातही महत्वाचे आहे. भारत क्षमतेचा विकास, ज्ञानाचे वाटप, आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार यामध्ये सक्रियपणे सहभागी होत आहे. विम्याचे भविष्य डेटा उपक्रमांमध्ये, ग्राहकांच्या सूचीबद्धतेमध्ये असल्याने आयबीएआयने यामध्येही सहभागी होवून भविष्यातील अर्थव्यवस्थेचे प्रेरणास्थान बनावे,असेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.

    विद्यापीठ स्तरावर विमा प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी पुढाकार

    युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. राज्यातील विद्यापीठात आयबीएआयसोबत संयुक्तपणे विमा शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचा मानस राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

    यावेळी आयबीएआयच्या २५ वर्षांतील स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन, लोगोचे अनावरण झाले. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणचे सदस्य सत्यजित त्रिपाठी, विमा समितीच्या सदस्या श्रीमती टी.एल. अलामेलू यांनीही विचार व्यक्त केले. अध्यक्ष श्री. भरिंदवाल यांनी प्रास्ताविक केले तर आभार निर्मल बजाज यांनी मानले.

    0000

    धोंडिराम अर्जुन/ससं/

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed