• Fri. Mar 6th, 2026
    ‘मनोमिलनाचा प्रश्न गहन नाही,’ म्हणत उदयनराजेंकडून एकत्र येण्याचे संकेत, शिवेंद्रराजेही स्पष्टच बोलले

    Shivendraraje And Udayanraje Together : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राजे गटांच्या मनोमिलनावर भाष्य करताना ‘मनोमिलनाचा प्रश्न गहन नाही’, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते. त्यानंतर बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    सातारा : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राजे गटांच्या मनोमिलनावर भाष्य करताना ‘मनोमिलनाचा प्रश्न गहन नाही’, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते. त्यानंतर बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्ही दोघेही भाजपमध्ये आहोत. निवडणुका जाहीर झाल्यावर पार्टी जो निर्णय घेईल, त्याप्रमाणे होईल, असे शिवेंद्रराजे म्हणाले आहेत.

    आगामी नगरपालिका निवडणुकीतील दोन्ही राजे गटांच्या मनोमिलनावरील प्रश्नावर उदयनराजेंनी नुकतंच भाष्य केलं होतं. ‘मनोमिलन हा काही गहन प्रश्न नाही’. सगळे बसून ठरवू, मी स्थानिक पातळीवर कधीही राजकारण करत नाही. कोणालाही बाजूला करण्याचा कार्यक्रम मी केला नाही. शिवेंद्रराजे भोसले हे मिनिस्टर असल्याने ते बिझी आहेत. निवडणुकीच्या संदर्भात त्यांच्यासोबत लवकरच चर्चा करू, निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. आता यापुढील निर्णय शिवेंद्रराजेंनी घ्यावा, असे म्हणत उदयनराजेंनी ‘मनोमिलना’चा चेंडू शिवेंद्रराजेंच्या कोर्टात सरकवला होता.
    हनीट्रॅप प्रकरणात मोठा ट्विस्ट; खडसेंनी जुना व्हिडीओ काढला, ‘एक बटण दाबलं तर…’
    साताऱ्यात माध्यमांशी बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले की, निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत. ज्या त्या वेळी पार्टी निर्णय घेईल. भाजप नेते काय ठरवताहेत त्याप्रमाणे पुढचे निर्णय होतील. मी आणि उदयनराजे दोघेही भाजपमध्ये पदाधिकारी आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढायच्या, हे आमच्या पार्टीकडून ठरवलं जाईल. भाजपाचे नेते संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या संदर्भात जो निर्णय घेतील, त्याची आम्ही अंमलबजावणी करू, असं शिवेंद्रजींनी सांगितलं.

    लातूर बंदवर पालकमंत्री या नात्याने बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले, लोकशाहीत आंदोलनाचा सर्वांना अधिकार आहे. ज्यांना स्वतःहून बंदमध्ये सहभागी व्हायचे आहे, ते होतील. पण, जबरदस्ती आणि दादागिरी चालणार नाही, यावर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे.

    दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. पक्षबांधणीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यातच ठाकरे बंधू देखील एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. तर इथे साताऱ्याच्या राजकारणात दोन राजे एकत्र आल्याने कार्यकर्ते तर सुखावणारच आहेत. पण राजकारणाला ही वेगळे वळण लागू शकणार आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा