Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवावर भाष्य करताना, अंतर्गत स्पर्धेमुळे फटका बसल्याचा आरोप त्यांनी केला. राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत सकारात्मक संकेत देताना, ‘ठाकरे’ वारे कायम राहणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीचा टीझर आज रिलीज करण्यात आला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक निकालाबाबत बोलताना म्हटलंय की, “लोकसभा निवडणुकीला आपलेपणा होता, आपल्याला जिंकायचंय ही भावना होती त्यामुळे विजय झाला. मात्र विधानसभेला मला जिंकायचंय, अशी भावना प्रत्येकाची झाली आणि जेव्हा आपल्यातून मीपणा आला तेव्हा विधानसभेला पराभव झाला,” अशा शब्दांत ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील अंतर्गत स्पर्धेतून हा पराभव झाल्याचा आरोप केला आहे.
‘नशिबासोबत भांडण, माझी हार, हा दुर्दैवी क्षण’, प्रकाश महाजन प्रचंड भावूक
उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही दिवसांपूर्वी मराठी विजय मिळाव्याच्या निमित्ताने दोन दशकांनंतर एका व्यासपीठावर आले होते. या मेळाव्यानंतर दोन्ही भावांच्या राजकीय युतीची चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरे वारे काही केल्या हटत नाही,” असं संजय राऊत म्हणाले. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, “ठाकरे म्हणजे सदासर्वकाळ संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही तर समाजासाठी आम्ही करत आलोय. आधी माझे आजोबा, नंतर शिवसेनाप्रमुख आणि आता मी असेल किंवा आदित्य आणि आता सोबत राजही आला आहे,” असं म्हणत उद्धव यांनी यापुढेही आम्ही दोघे बंधू एकत्र राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टीका
या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. शिंदे गटाला ५० पेक्षा अधिक जागा विधानसभा निवडणुकीत मिळाल्या, हा जादूटोणा आहे की काय आहे? असं मुलाखतीदरम्यान संजय राऊत म्हणाले. त्यावर मिश्किल उत्तर देत उद्धव ठाकरे म्हणाले की, कदाचित त्यांनी डायनासोर कापला असेल.
दरम्यान, “मीच असा मुख्यमंत्री होतो, ज्याने कोणीही न मागता शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली, जो नियमित कर्जफेड करतो अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर आपण दिले, मुंबईमध्ये ५०० स्केअर फूट एरियापर्यंत मालमत्ता कर रद्द केला, कोरोनाच्या काळात अनेक राज्यात प्रेतं वाहत असताना आपण जनतेच्या आणि प्रशासनाच्या मदतीने उत्तम काम केलं,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळावर भाष्य केलं आहे.

