• Thu. Mar 12th, 2026
    रील बनवण्याचा मोह जीवावर बेतला, रेल्वेवर उभं राहताच उच्चदाब तारेला स्पर्श अन् सारंच संपलं; आरवचा उपचारादरम्यान अंत

    Navi Mumbai News : सोशल मीडियावर झळकायला थरारक रील बनवण्याचा मोह एका १६ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला आहे. बेलापूरमधील रहिवासी आरव संतुलन श्रीवास्तव याचा उपचारादरम्यान अंत झाला आहे. रील बनवत असताना तो उच्चदाब विद्युत तारेच्या संपर्कात आला होता. यामध्ये त्याच्या शरीराचे ६०% भाग भाजला गेला. त्यामुळे तो जीवाला मुकला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    अमुलकुमार जैन, नवी मुंबई : सोशल मीडियावर झळकायला थरारक रील बनवण्याचा मोह एका १६ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला आहे. बेलापूरमधील रहिवासी आरव संतुलन श्रीवास्तव याचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान अंत झाला आहे. मागील आठवड्यात ७ जुलैला नेरुळमधील राजीव गांधी पुलाजवळील रेल्वे कचरा व्हॅनवर चढून रील बनवत असताना तो उच्चदाब विद्युत तारेच्या संपर्कात आला होता. यामध्ये त्याच्या शरीराचे ६०% भाग भाजला गेला. उपचाराअंती त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    आरव आपल्या ३ मित्रांसोबत त्या दिवशी बाहेर पडला होता. एक रील शूट करण्याच्या हेतूने तो स्थानकाजवळ उभ्या असलेल्या रेल्वेच्या कचरा गोळा करणाऱ्या व्हॅनवर चढला. मात्र, त्या क्षणी त्याचा ट्रेनच्या वरील उच्चदाब तारेशी संपर्क झाला आणि एक क्षणात तो वीजेच्या धक्क्याने भाजला गेला. त्याचे मित्र घाबरलेले होते, पण त्यांनी धाडस करून त्याला तत्काळ टर्ना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर अपोलो हॉस्पिटल आणि शेवटी ‘नॅशनल बर्न्स सेंटर’, ऐरोली येथे त्याच्यावर उपचार सुरू झाले.
    Nandurbar News: निर्दयी काळ! रुग्णालयात जाताना गाडीवर झाड कोसळलं, माय-लेकाचा दुर्दैवी अंत, नंदुरबार हळहळलं
    डॉक्टरांच्या मते, आरवच्या शरीरावर गंभीर भाजल्याच्या जखमा होत्या. डोक्याला मार बसलेला होता, चेहऱ्यावर हाडं मोडली होती, आणि तो व्हेंटिलेटरवर होता. नॅशनल बर्न्स सेंटरचे संचालक डॉ. एस. एम. केसवानी म्हणाले, ‘तो अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होता. सुरुवातीपासूनच सेप्सिसची लक्षणं दिसू लागली होती. सर्व प्रयत्न करूनही, त्याला वाचवणं शक्य झालं नाही.

    दरम्यान, आरवच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ‘आम्ही सतत देवाकडे प्रार्थना करत होतो. त्याने उभं राहावं, डोळे उघडावे. पण देवानेच डोळे फिरवले,’ असे आरवच्या आईने सांगितले. आजच्या तरुण पिढीला सोशल मीडियावर व्हायरल होण्याची एक वेगळीच धडपड आहे. रेलिंगवर उभं राहून फोटो किंवा रील काढणं, ट्रेनच्या समोरून धावत येणारी रील, उंचावरून सेल्फी या प्रकारांनी अनेक जीव धोक्यात येत आहेत.

    आरवसारखा हुशार, संवेदनशील मुलगा केवळ क्षणिक रीलसाठी जीव गमावून बसला. पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने यातून धडा घ्यायला हवा. सोशल मीडियावर रील बनवण्यामागचं आकर्षणासाठी केलेलं धाडस आणि त्यातून होणाऱ्या अपघातांविषयी विद्यार्थ्यांना, मुलांना जागरूक करणं अत्यावश्यक आहे. आरवच्या मृत्यूने एक गोष्ट अधोरेखित केली आहे… ते म्हणजे जीवन क्षणभंगुर आहे, आणि एक क्षणाचा थरार संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा