• Wed. Jun 10th, 2026
    मनोज जरांगेंचे आंदोलन जवळ येताच ओबीसींच्या हालचाली सुरू; समीर भुजबळ म्हणाले…

    Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट करण्याच्या मागणीला ओबीसींचा विरोध आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने राज्यभर संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. समीर भुजबळ यांनी अहिल्यानगरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

    मनोज जरागेंचे आंदोलन जवळ येताच ओबीसींच्या हालचाली सुरू; समीर भुजबळ म्हणाले… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    विजयसिंह होलम, अहिल्यानगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आरपारचे आंदोलन करण्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यासाठी तयारीच्या बैठकाही सुरू आहेत. मराठ्यांचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करावा, अशी जरांगे यांची प्रमुख मागणी आहे. तर दुसरीकडे मराठ्यांचा ओबीसींमध्ये समावेश करण्यास ओबीसींचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने राज्यभर संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. परिषदेचे कार्याध्यक्ष व माजी खासदार समीर भुजबळ यासाठी शनिवारी अहिल्यानगरला आले होते. त्यांनी येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

    समीर भुजबळ म्हणाले, मराठा समाजाचा सरसकट समावेश ओबीसींमध्ये करण्यास अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा विरोधच आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मराठा मोर्चांसंबंधी भूमिका काय आहे, हे मंत्री छगन भुजबळच जाहीर करतील. ओबीसींमध्ये साडेचारशेवर जाती असून, त्यांच्यासाठी फक्त 27 टक्के आरक्षण आहे. त्यापैकीही केवळ 19 टक्के खर्‍या ओबीसींना त्याचा लाभ मिळतो. त्यामुळे ओबीसींची संघटनात्मक बांधणी परिषदेने प्राधान्याने हाती घेतली आहे व आगामी जात जनगणनेत प्रत्येक ओबीसीने आपली योग्य नोंद होण्याच्यादृष्टीने जागरूक राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

    ‘कितीही मोठ्या बापाचा असूदे, टायरमध्ये घेऊन झोडायला सांगणार’; अजित दादांनी कुणाला भरला दम?

    जरांगे पाटलांचे मराठा मोर्चे व आंदोलनाचे थेट नाव न घेता कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, मध्यंतरी ओबीसी आरक्षण धोक्यात आले होते. त्यावेळी ना. छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन लढा उभारला. त्यामुळे आरक्षणावर आलेली गदा थोपवली गेली. आता पुन्हा त्याच प्रकारची भूमिका घेतली जात असल्याने त्याविरोधात ओबीसींचे मजबूत संघटन उभे करण्यासाठी संघटनात्मक बैठका घेतल्या जात आहेत. पदाधिकारी बदल, नवी पद निर्मिती, ओबीसीतील सर्व समाज घटकांना परिषदेत पदाधिकारी म्हणून स्थान या अनुषंगाने फेररचना सुरू आहे, असे स्पष्ट करून समीर म्हणाले, जरांगे पाटील 29 ऑगस्टला पुन्हा मोर्चा काढणार असल्याचे बोलले जात असले तरी लोकशाहीत प्रत्येकाची मर्जी असते. त्यांनी काय भूमिका मांडायची हा त्यांचा विषय आहे. त्यांची भूमिका जाहीर झाल्यावर आम्ही आमची भूमिका मांडू, असेही त्यांनी सांगितले.

    दरम्यान, या बैठकीला संयोजक डॉ. नागेश गवळी, माजी आमदार पांडुरंग अभंग, बापूसाहेब भुजबळ, नगरमधील भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, अंबादास गारुडकर, संजय गारुडकर आदींसह घनश्याम शेलार, अनिल निकम, सुभाष लोंढे, भारत गारुडकर, किशोर जेजुरकर, अमित खामकर, विशाल वालकर, ब्रिजेश ताठे, दीपक खेडकर, अभिषेक चिपाडे, प्रकाश इवले, अ‍ॅड. सुभाष राऊत, प्रा. सत्संग मुंडे, समाधान जेजुरकर व जिल्हाभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय. यापूर्वी लोकमत आणि न्यूज १८ लोकमत या संस्थांमध्येही कामाचा अनुभव.… आणखी वाचा