Navi Mumbai Airport : नवी मुंबईतील विमानतळ लवकरच सुरू होणार आहे. विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सप्टेंबर महिन्यात विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. हे विमानतळ व्यापार आणि उद्योगाचे केंद्र ठरेल. या विमानतळामुळे कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
यापूर्वी जूनमध्ये या विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त काढण्यात आला होता. मात्र टर्मिनल काम अपुरं असल्याने हे उद्घाटन रद्द करावं लागलं. त्यानंतर 15 ऑगस्ट या दिवशी या विमानतळाचा उद्घाटनाचा मुहूर्त काढण्यासाठी चाचणी सुरू होती. मात्र हे काम पूर्ण होणार नसल्याने आता सप्टेंबर महिन्यातच नवी मुंबई विमानतळावरून पहिले विमान उड्डाण घेईल, अशी शक्यता आहे.
नवी मुंबई येथील विमानतळ उभारण्यासाठी अदानी समूहाकडून राज्याच्या सार्वजनिक उपक्रम समितीला विमानतळ सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्याचा कालावधी सांगण्यात आला आहे. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवी मुंबईतून विमानतळावरून फ्लाईट टेक ऑफचा शुभारंभ करण्याचा राज्य सरकार आणि अदानी समूहाचा विचार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळ सुरू होण्यासाठी सप्टेंबर महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. हे विमानतळ सुरु झाल्यास याचा मोठा फायदा कोकणातील उद्योग आणि पर्यटनालाही होणार आहे.
टर्मिनलचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी किमान सप्टेंबर महिन्यापर्यंत कालावधी लागेल, अशी माहिती अदानी समूहातर्फे सार्वजनिक उपक्रम समितीच्या आढावा बैठकीत सांगण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळ हे अत्यंत महत्त्वाचं असून मुंबई महानगर प्रदेश आणि येथील वाहतूक उद्योगाच्या दृष्टीने हे मोठं केंद्र असणार आहे. त्यामुळे हे विमानतळ सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची मोठी कनेक्टिव्हिटी आणि व्यापार वाढीच्या नव्या संधी महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठीही उपलब्ध होणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

