• Fri. Mar 6th, 2026
    नवी मुंबई विमानतळ कधीपासून सुरु होणार? महत्त्वाची माहिती समोर

    Navi Mumbai Airport : नवी मुंबईतील विमानतळ लवकरच सुरू होणार आहे. विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सप्टेंबर महिन्यात विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. हे विमानतळ व्यापार आणि उद्योगाचे केंद्र ठरेल. या विमानतळामुळे कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    प्रसाद रानडे, नवी मुंबई : महाराष्ट्रात मुंबई जवळ नवी मुंबई येथे विमानतळ उभं राहिलं आहे. या विमानतळाचा मोठा फायदा मुंबई बरोबरच कोकण आणि उर्वरित महाराष्ट्राला होणार आहे. विमानतळाचं काम जवळपास पूर्णत्वास आलं आहे. लवकरच या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. या विमानतळावरून लवकरच विमानाचे उड्डाण करण्याचा मुहूर्त काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई येथील विमानतळ सुरू झाल्यास हे व्यापाऱ्याचेही मोठे महाकेंद्र होणार आहे. अदानी उद्योग समूहाकडून त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. या सगळ्याबाबत शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही लवकरच नवी मुंबई विमानतळ सुरू होईल. अशा स्वरूपाची माहिती माहिती दिली आहे.

    यापूर्वी जूनमध्ये या विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त काढण्यात आला होता. मात्र टर्मिनल काम अपुरं असल्याने हे उद्घाटन रद्द करावं लागलं. त्यानंतर 15 ऑगस्ट या दिवशी या विमानतळाचा उद्घाटनाचा मुहूर्त काढण्यासाठी चाचणी सुरू होती. मात्र हे काम पूर्ण होणार नसल्याने आता सप्टेंबर महिन्यातच नवी मुंबई विमानतळावरून पहिले विमान उड्डाण घेईल, अशी शक्यता आहे.

    नवी मुंबई येथील विमानतळ उभारण्यासाठी अदानी समूहाकडून राज्याच्या सार्वजनिक उपक्रम समितीला विमानतळ सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्याचा कालावधी सांगण्यात आला आहे. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवी मुंबईतून विमानतळावरून फ्लाईट टेक ऑफचा शुभारंभ करण्याचा राज्य सरकार आणि अदानी समूहाचा विचार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळ सुरू होण्यासाठी सप्टेंबर महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. हे विमानतळ सुरु झाल्यास याचा मोठा फायदा कोकणातील उद्योग आणि पर्यटनालाही होणार आहे.

    टर्मिनलचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी किमान सप्टेंबर महिन्यापर्यंत कालावधी लागेल, अशी माहिती अदानी समूहातर्फे सार्वजनिक उपक्रम समितीच्या आढावा बैठकीत सांगण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळ हे अत्यंत महत्त्वाचं असून मुंबई महानगर प्रदेश आणि येथील वाहतूक उद्योगाच्या दृष्टीने हे मोठं केंद्र असणार आहे. त्यामुळे हे विमानतळ सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची मोठी कनेक्टिव्हिटी आणि व्यापार वाढीच्या नव्या संधी महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठीही उपलब्ध होणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा