• Thu. Mar 12th, 2026

    आधी सरकारवर थेट टीका टाळली न् आता आदेश काढला; युती होणार की नाही? राज ठाकरेंनी संभ्रम वाढवला

    आधी सरकारवर थेट टीका टाळली न् आता आदेश काढला; युती होणार की नाही? राज ठाकरेंनी संभ्रम वाढवला

    ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चेनंतर, उद्धव ठाकरेंनी युतीचे संकेत दिले, पण राज ठाकरेंनी युतीबद्दल स्पष्ट बोलणं टाळलं. युतीबाबत बोलण्यापूर्वी विचारण्याचे आदेश राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत, ज्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची आणि त्यांच्या एकत्र सभेची चर्चा संपूर्ण राज्यात सुरु आहे. या सभेनंतर विरोधकांनी दोन्ही ठाकरेंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईच्या वरळीत झालेल्या सभेत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे ंनी युतीचे स्पष्ट संकेत दिले. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी युतीचे संकेत दिले. पण मनसे प्रमुख राज ठाकरेंनी युतीबद्दल स्पष्ट बोलणं टाळलं. त्यांनी त्यांच्या भाषणाचा रोख मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि हिंदी सक्तीवर होता. उद्धव ठाकरे युतीवर बोलत असताना राज यांनी मात्र त्यावर कोणतंही भाष्य करणं टाळलं.

    ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला ४८ तास उलटले आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा जोरात आहे. असं असताना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. युतीसंदर्भात कोणीही बोलू नये. बोलण्याआधी मला विचारावं, असे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. युतीसंदर्भात कोणीही बोलू नये. कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात बोलाताना आधी मला विचारावं, असं फर्मान राज ठाकरेंनी काढलं आहे. त्यामुळे मनसे सोबतच शिवसेना उबाठाच्या पदाधिकारी आणि नेत्यांच्या मनातही संभ्रम निर्माण झालेला आहे.

    शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे वरळीतील कार्यक्रमात भाषण करताना सत्ताधाऱ्यांवर अक्षरश: तुटून पडले. त्यांनी फडणवीस यांचा उल्लेख थेट अनाजीपंत असा केला. आम्हा दोघांमधला (ठाकरे बंधू) अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. पण राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर फार टीका करणं टाळलं. बाळासाहेबांना जे जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं. त्यांनी आम्हाला एकत्र आणलं, अशा खोचक टोला राज यांनी फडणवीस यांना लगावला. राज यांचं उर्वरित भाषण मराठी भाषा, मराठी अस्मिता याच मुद्द्यांवर होतं.

    जय गुजरात म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंनी जोरदार समाचार घेतला. काल एक गद्दार जय गुजरात म्हणाला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे शिंदे यांच्यावर तुटून पडले. पण राज यांनी शिंदे यांना लक्ष्य करणं टाळलं. त्यामुळे राज यांच्या मनात नेमकं काय चाललंय, असा प्रश्न अनेकांना पडला. आम्ही तुम्हाला फेकून देऊ, सोबत महाराष्ट्र काबीज करु, अशी युतीच्या जवळपास जाणारी भाषा उद्धव करत असताना राज यांनी मात्र युतीवर काहीही बोलणं टाळलं.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा