Kolhapur Crime News : कोल्हापुरात भयंकर घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून फक्त एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरुन एका तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. मात्र याच्या काही तासांतच या प्रकरणाचा छडा लावण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले.
कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात कुरुंदवाडमध्ये पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. सिद्धार्थ चौकात शनिवारी (६ जुलै) रात्री अकरा वाजता सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिघा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कुरुंदवाड पोलिसांना यश आलं आहे. मृत तरुणाचं नाव अक्षय दीपक चव्हाण (रा. मंजरेवाडी, कुरुंदवाड, ता. शिरोळ) आहे. त्याला धारदार शस्त्राने वार करून ठार करण्यात आलं. याप्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून यश काळे (रा. कुरुंदवाड) आणि त्याच्या इतर दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुणे पोलीस दलात खळबळ! अंमलदाराने टॉवेलच्या मदतीने थेट….धक्कादायक घटना
नेमकंकाय घडलं?
५ जुलैला मृत अक्षय चव्हाण आणि आरोपी यश काळे यांच्यात एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी अक्षयने यश काळेला मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून यश आणि त्याचे साथीदार अमन जमीर दानवाडे (रा. इचलकरंजी) आणि श्रीजय बाबू बडसकर (रा. औरवाड) या तिघांनी मिळून अक्षय चव्हाण याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात अक्षयचा जागीच मृत्यू झाला आहे.पोलिसांचा शिताफीने लावला संशयितांचा शोध
खून झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आलं. या पथकातील पोलीस कर्मचारी संजय कुंभार आणि सागर माने यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शिरोली एमआयडीसी परिसरात लपल्याचं समोर आलं.
त्यानंतर पोलिसांनी पाच तास शिरोली एमआयडीसी परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान, काळ्या रंगाच्या अॅक्टिव्हा (MH-11/BQ-8269) या दुचाकीवरून तीन युवक जाताना दिसले. पोलिसांनी पाठलाग करत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता तिघेही गाडी सोडून पळाले. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून तिघांना शिताफीने पकडले. तिघांची नावं विचारली असता, त्यांनी आपली नावं यश काळे, अमन दानवाडे आणि श्रीजय बडसकर अशी सांगितली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तिघांना कुरुंदवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
किरकोळ वादातून खूनाच्या घटना चिंताजनक
किरकोळ वादातून जीव घेण्याइतकी हिंसा होणं, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलद गतीने करत आरोपींना अटक केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

