• Sat. Mar 14th, 2026
    रायगडात पाकिस्तानी संशयित बोट आढळली, सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांच्या सतर्कतेने धोका टळला

    Suspicious Pakistani Boat Found : रायगडातील कोर्लई किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळल्याच्या वृत्ताने संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. घटनास्थळी कोणतीही बोट प्रत्यक्षपणे न सापडल्याने सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता. मात्र नौदलाच्या रडारवर आढळलेल्या माहितीच्या आधारे पाकिस्तानी बोट आढळली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    अमुलकुमार जैन, रायगड : रायगडातील कोर्लई किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळल्याच्या वृत्ताने संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. घटनास्थळी कोणतीही बोट प्रत्यक्षपणे न सापडल्याने सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता. मात्र नौदलाच्या रडारवर आढळलेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहीम राबवली तेव्हा संशयित पाकिस्तानी बोट दिसली.

    वृत्तानुसार, ६ जुलै २०२५ ला रात्री ८.५२ वाजता भारतीय तटरक्षक दल, मुरूड यांच्याकडून रायगड जिल्ह्यातील कोर्लई किल्ल्यापासून सुमारे 2.5-3 नॉटिकल मैलांवरील समुद्रात ‘Muqadar Boya 99’ नावाची MMSI-463800411 क्रमांकाची संशयित पाकिस्तानी बोट दिसल्याची माहिती मिळाली. याबाबत त्वरित अलर्ट जारी करत रायगड पोलीस दलाकडून तात्काळ कारवाई सुरु करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, SDPO व स्थानिक पोलीस ठाण्यांचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले.

    प्राथमिक अंदाजानुसार, ही बोट खोल समुद्रात असल्याचे सांगितले गेले. रायगड पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी तातडीने प्रतिसाद दिला. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने समुद्रात शोध घेण्यात आला. तपासादरम्यान ‘मुकद्दर बोया 99’ नावाची पाकिस्तानी मासेमारी बोट रडारवर असल्याचे स्पष्ट झाले. ही बोट वादळामुळे पाकिस्तानमधील कराचीकडून भारतीय जलसीमेत वाहून आल्याचा अंदाज नौदलाने वर्तवला आहे.

    मात्र प्रत्यक्षात रेवदंडा परिसरात आढळलेली वस्तू ही बोटीचा एक छोटा भाग होता. संबंधित बोट ही पाकिस्तानच्या कराचीमध्येच आहे. मासेमारी बोटीचे नाव बोया असल्याने त्याला जीपीएस ट्रॅकर आहे. या ट्रॅकरमुळेच भारतीय नौदलाने बोटीची ओळख पटवली आहे. मात्र मूळ बोट पाकिस्तानात असून बोटीचा काही अवशेष भारतात वाहून आल्याचे निष्पन्न झाले आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी रायगड जिल्हा पिंजून काढला मात्र काळजी करण्यासारखे कारण नसल्याचे रायगड पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

    या संदर्भात रायगड पोलिसांनी १६ ठिकाणी सशस्त्र नाकाबंदी, सागरी किनाऱ्यावरील हॉटेल्स, रिसॉर्ट्स, लॉजेस आणि होम स्टे यांची तपासणी, तसेच जलद प्रतिसाद पथक व BDS तुकड्या कोर्लई, रेवदंडा, साळाव परिसरात गस्तीसाठी पाठवण्यात आल्या. स्थानिक मच्छीमार, सागररक्षक दल, भारतीय नौदल व तटरक्षक दल यांच्यासह संयुक्त शोधमोहीम राबवून समुद्रात बोट व संशयित वस्तू शोधल्या गेल्या. यामध्ये ड्रोन तपासणी, GPS फ्लोटर यंत्रणा तपासण्यात आली आहे.

    जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत तसेच सागरी व खाडी किनारी भागात असे एकुण 19 ठिकाणी सशस्त्र नाकाबंदी कऱण्यात आली आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सर्व सागरी व खाडी किनारी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सबंधित विभागांना यांच्याकडून हद्दीतील लँडीग पॉईंट व समुद्र किनाऱ्यावर पुरेसे मनुष्यबळ नेमून शोध मोहिम राबविण्यात येत आहे. तसेच सागर रक्षक दल, स्थानिक मच्छिमार व स्थानिक नागरीक यांना विश्वासात घेऊन संशयित बोटी व इसम तपासण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा