• Tue. Mar 10th, 2026

    Mumbai Nashik Highway: नाशिक मार्गावर कंत्राटाचे ‘खड्डे’! महामार्गाच्या विस्तारीकरण कामाला खांदेपालटामुळे विलंब

    Mumbai Nashik Highway: नाशिक मार्गावर कंत्राटाचे ‘खड्डे’! महामार्गाच्या विस्तारीकरण कामाला खांदेपालटामुळे विलंब

    Mumbai Nashik Highway: राष्ट्रीय महामार्ग ३ हा मुंबई ते आग्रा महामार्ग आहे. त्यातील ठाणे ते नाशिक या १५० किमीच्या मार्गाचे विस्तारीकरण करून त्याला द्रुतगती मार्गात रूपांतरित केले जात आहे.

    mumbai nashik highway (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई : मुंबई-आग्रा म्हणजेच मुंबई-नाशिक महामार्गाच्या विस्तारीकरणात कंत्राटदार बदलामुळे विलंब झाला आहे. प्रामुख्याने चार मोठ्या पुलांची उभारणी बाकी असून त्यापैकी दोन पुलांच्या उभारणीसाठी नवीन कंत्राटदार नियुक्त करावे लागले आहेत. त्यात एका खाडीपुलाचा समावेश आहे. हे काम यंदाच्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र त्यास किमान आठ महिन्यांचा विलंब झाला आहे.

    राष्ट्रीय महामार्ग ३ हा मुंबई ते आग्रा महामार्ग आहे. त्यातील ठाणे ते नाशिक या १५० किमीच्या मार्गाचे विस्तारीकरण करून त्याला द्रुतगती मार्गात रूपांतरित केले जात आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) हे काम हाती घेतले आहे. यापैकी ठाणे ते वडपे या २४ किमीचे काम सातत्याने रखडलेले आहे. त्यापुढील वडपे ते गोंदे हे काम बऱ्यापैकी गतीने सुरू आहे. यातील ठाणे ते वडपे हे काम एनएचएआयने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) दिले असून त्यांनी या कामासाठी कंत्राटदार नेमले आहेत. आता त्यातील दोन कंत्राटदारांना बदलावे लागले आहे.
    केसांची क्लिप, चाकूने फलाटावरच महिलेची प्रसूती! लष्करातील डॉक्टर बनले देवदूत, झाशी रेल्वे स्टेशनवर बाळाचा जन्म
    या मार्गावर कळवा व कशेळी, असे दोन खाडीपूल, एक वडपे गावावरील पूल व दिवा-वसई रेल्वेवर पिंपळनेर येथील पुलाचा समावेश आहे. या चारही पुलांचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने प्रामुख्याने विस्तारीकरण प्रकल्प रखडला आहे. यापैकी वडपे गावावरील पुलाच्या नाशिक-मुंबई मार्गिकेचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने त्यातील कंत्राटदार कंपनी बदलून नव्या कंपनीकडे काम देण्यात आले आहे. तर कशेळी येथील खाडीपुलाचे दोन्ही दिशेकडील (मुंबई-नाशिक व नाशिक-मुंबई) कंत्राटदार कंपनी अलीकडेच बदलण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
    Pune Crime: अंगापेक्षा बोंगा जड! चोरी तर केली, पण वजन तोलवेना; रस्त्यात तिजोरी फेकून चोराने ठोकली धूम
    या घडामोडींना एनएचएआयच्या उच्चाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. हे काम एनएचएआयच्या प्रादेशिक मुख्यालयांतर्गत ठाणे उप विभागांतर्गत सुरू आहे. ‘कंत्राटदार बदलल्यानंतर आता पुलांची कामे वेगाने सुरू आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने नियमित आढावा घेऊन पाठपुरावा सुरू आहे’, असे उपविभाग प्रमुख सुहास चिटणीस यांनी याबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा