• Fri. Jul 3rd, 2026

    महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार? भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचे स्पष्ट संकेत

    महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार? भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचे स्पष्ट संकेत

    Girish Mahajan Big Claim About Shiv Sena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. विश्वास नसेल तर येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असादेखील दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. ठाकरेंवर आता कुणाचा विश्वास राहिलेला नाही, अशी टीकादेखील गिरीश महाजन यांनी केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी भरपूर घडामोडी घडायच्या बाकी असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामागे कारण देखील तसंच आहे. भाजपचे ‘संकटमोचक’ म्हणून ख्याती असलेले नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल मोठा दावा केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. गिरीश महाजन यांनी आगामी काळात याबाबतचं चित्र स्पष्ट होईल, असं देखील म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप घडणार असल्याचे संकेत गिरीश महाजन यांनी दिले आहेत. गिरीश महाजन यांनी ‘एबीपी माझा’ला प्रतिक्रिया देताना संबंधित दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानुसार आगामी काळात खूप काही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

    महाराष्ट्राचं राजकारण सध्या वेगळ्या वळणावर येताना दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन भावांचा नुकताच विजयी मेळावा पार पडला आहे. या मेळाव्याने महाराष्ट्रातील नव्या राजकीय समीकरणाचे संकेत दिले आहेत. ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. लाखो मराठी नागरिकांची ही इच्छा होती. ही इच्छा आता पूर्ण होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यातलं राजकारण बदलण्याची शक्यता आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद आहे. कारण विधानसभा निवडणुकीत ठाकरेंचे सर्वाधिक आमदार हे मुंबईतून जिंकून आले. तर लोकसभा निवडणुकीतही तेच बघायला मिळालं होतं.

    आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंची ताकद कमी करावी यासाठी महायुती राज ठाकरे यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. पण दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजपसाठी मुंबई महापालिकेत मोठं चॅलेंज असणार आहे. ठाकरेंची मुंबईत ताकद आहे. ही ताकद कमी करायची असेल तर मग त्यांच्या मुंबईतील आमदारांना फोडलं तर ते शक्य होऊ शकतं. त्यामुळे गिरीश महाजन यांचा रोख हा मुंबईतील ठाकरेंच्या आमदारांच्या दिशेला तर नव्हता ना? असा प्रश्न उपस्थित होतोय. ठाकरेंचे आमदार-खासदार आमच्या संपर्कात असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट म्हटलं आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

    भाजपचा नाशिकवर फोकस, मविआला गळती, गिरीश महाजन यांनी आतली बातमी सांगितली

    गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

    “त्यांच्याकडे कोणी राहिलेलं नाही. कोणी आमदार त्यांच्याकडे राहिलेले नाहीत. ठाकरे गटातील अनेक नेते आमच्याकडे येण्यासाठी धडपडत आहेत. इतकी धडपड चालू आहे, वारंवार येत आहेत. भेटी देत आहेत. त्यांच्यावर कुणाचाही विश्वास राहिलेला नाही. त्यांचे खासदार देखील आमच्या संपर्कात आहेत. आम्हाला तिकडे राहायचं नाही, अशी खासदारांची भूमिका आहे. तिकडे शेवटी काय आहे, बोल बच्चन अमिताभ बच्चन”, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा