हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जल्लोष केला. मनसे कार्यकर्त्यांनी मराठी न बोलणाऱ्या दुकानदाराला मारहाण केल्याने वाद वाढला.
राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र हैं क्या?, अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते नवीन जिंदाल यांनी मनसे प्रमुखांना लक्ष्य केलं आहे. नवीन जिंदाज भाजपचे माजी मीडिया प्रमुख राहिले आहेत. सध्याच्या घडीला ते भाजपचे प्रवक्ते आहेत. दिल्ली भाजपची भूमिका ते सातत्यानं मांडत असतात. राज ठाकरेंचा बाप काढणारी पोस्ट त्यांनी एक्सवर पिन करुन ठेवलेली आहे.
राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र हैं क्या ?
— Naveen kr Jindal (@naveenjindalbjp) July 3, 2025
नवीन जिंदाल यांनी राज ठाकरेंवर तोफ डागणाऱ्या आणखी दोन पोस्ट केलेल्या आहेत. ‘राज ठाकरेंसारख्या सडकछाप गुंडांची जागा तुरुंगात आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा,’ अशी जहाल शब्दांतील पोस्ट त्यांनी लिहिलेली आहे. राज ठाकरेंमध्ये इतकी हिंमत असेल तर त्यांनी मुंबईतील शांतीदूतांना मराठी भाषा बोलायला लावावी, असं थेट आव्हान जिंदल यांनी दिलेलं आहे.हिंदी भाषासक्तीवरुन भाजपची भूमिका स्पष्ट आहे. त्यांनी त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार केलेला आहे. इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवली जावी, अशी भाजपची भूमिका आहे. तर मनसेचा याला विरोध आहे. भाजपनं सुरुवातीला यावरुन राज यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण राज ठाकरेंनी हिंदी सक्तीविरोधात भूमिका घेतली. हीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचीही भूमिका असल्यानं दोन्ही बंधू एकमेकांच्या जवळ आले. उद्या त्यांचा विजयी मेळावा संपन्न होत आहे.
राज ठाकरे जैसे सड़क छाप गुंडे की जगह जेल में हैंदेशद्रोह लगना चाहिए इस पर 🙏
— Naveen kr Jindal (@naveenjindalbjp) July 3, 2025
सुरुवातीला राज यांच्या भेटीगाठी घेणाऱ्या भाजप नेत्यांची भाषा एकाएकी बदलली आहे. मराठी भाषा न बोलल्यानं दुकानदारांना मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. मंत्री नितेश राणे यांच्यासारखे नेतेही राज यांच्यावर तुटून पडले आहेत. त्यामुळे मराठी-अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर मतांच्या ध्रुवीकरणासाठी राज ठाकरेंवर टीका केली जात आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.
मराठीच्या मुद्द्यावर राज यांना उद्धव ठाकरेंपेक्षा मोठं करण्याची खेळी भाजपकडून केली जात असल्याचीही चर्चा आहे. याचा फायदा राज ठाकरेंना उद्धव यांच्या पक्षाशी युती करताना वाटाघाटीत होऊ शकतो. अमराठी नागरिकांसाठी भूमिका घेऊन भाजपनं त्यांची एकगठ्ठा मतं आपल्याकडे वळवण्याचा प्लान आखल्याचंही बोललं जात आहे. या मुद्द्यावर राज यांचं महत्त्व वाढल्यास उद्धव यांचं महत्त्व आपोआप कमी होऊ शकतं.

