Mumbai Crime : भांडुपच्या महिंद्र स्प्लेंडर इमारतीच्या ३१व्या मजल्यावरून पडून मृत्यू झालेल्या मुलीची आत्महत्या नसून हत्या असल्याचे तपासातून उघड झाले आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून संतापलेल्या मित्राने तिला इमारतीवरून ढकलून दिल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड येथे आईसोबत वास्तव्यास असलेली १५ वर्षीय मुलगी २४ जूनला सायंकाळी शाळेपासून ओळख असलेल्या १६ वर्षांच्या मित्राला भेटण्यासाठी गेली. बोलता बोलता दोघेही महिंद्र स्प्लेंडर इमारतीच्या ३१व्या मजल्यावर आणि तेथून पाण्याच्या टाकीवर गेले. काही वेळाने वरून काहीतरी पडल्याचा जोरदार आवाज झाला. या मुलीने ३१व्या मजल्यावरून उडी मारल्याचे त्याच्या मित्राने सांगितले. तिला अभ्यासाचे टेन्शन होते आणि ती नैराश्यात होती. तिला समजाविण्याचा प्रयत्न केला मात्र तिने आत्महत्या केल्याची माहिती मित्राने पोलिसांना दिली. यावरून भांडुप पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली.
Mumbai News : ती रात्र आठवूनही धस्स, नातवाने कचऱ्यात फेकलेल्या आजीची व्यथा; त्याला काही करु नका, नाहीतर…
आपली मुलगी आत्महत्या करू शकत नाही. ती अभ्यासात हुशार होती त्यामुळे अभ्यासाचे तिला टेन्शन नव्हते. तिला मारले आहे असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. मुलुंड, भांडूप परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जमा केले. संशयाचा धागा पकडत पोलिसांनी मुलाची उलटसुलट चौकशी केली त्यावेळी मैत्रिणीला ढकलल्याने तिचा मृत्यू झाल्याचे मुलाने सांगितले. क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि त्यातून हे घडल्याचे तो म्हणाला. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून अल्पवयीन मित्राला ताब्यात घेत त्याची रवानगी डोंगरी येथील बालगृहात करण्यात आली आहे.

