• Mon. Mar 16th, 2026
    शालार्थ घोटाळ्याची चौकशी होणार! पोलिसांसह शिक्षण अधिकाऱ्यांची समांतर एसआयटी, दादा भुसेंची विधानसभेत घोषणा

    Nagpur Scholarship System Scam : नागपूर जिल्ह्यात शालार्थ प्रणालीत बनावट शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे समाविष्ट करुन कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणाचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. याप्रकरणी राज्यव्यापी ‘एसआयटी’ स्थापन करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    म.टा.प्रतिनिधी, मुंबई : नागपूर जिल्ह्यात शालार्थ प्रणालीत बनावट शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे समाविष्ट करुन कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणाचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. हे प्रकरण केवळ नागपूर जिल्ह्यापुरते मर्यादित नसून, इतर जिल्ह्यांतही फोफावले असण्याची शक्यता विधानसभेतील अनेक आमदारांनी सभागृहात व्यक्त केली. याप्रकरणी राज्यव्यापी ‘एसआयटी’ स्थापन करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी केली.

    या ‘एसआयटी’मध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सनदी अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात येईल, अशी माहिती भुसे यांनी दिली. येत्या तीन-चार महिन्यांत ‘एसआयटी’ला अहवाल देण्याची सूचना करण्यात येईल, त्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्याची घोषणा भुसे यांनी यावेळी विधानसभेत केली. नागपूर जिल्ह्यातील एक हजारहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे यादीत समावेश करून कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी आमदार प्रवीण दटके यांनी मंगळवारी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. यावेळी आमदार प्रशांत बंब, मुफ्ती मोहम्मद खालिक यांच्यासह अनेक आमदारांनी या चर्चेत सहभाग घेतला. या प्रकरणी दोषी असलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. दरम्यान, यावेळी आमदार मुफ्ती खालिक यांनी नाशिक विभागातील शिक्षण विभागांतील अधिकाऱ्यांची यादी जाहीर करताना हे अधिकारी वर्षांनुवर्षे त्याच जागेवर काम करीत आहेत, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
    विधानभवनात राडा, Nana Patole निलंबित : अध्यक्षांच्या दिशेने धावले नाना, मुख्यमंत्री भडकले
    यावेळी उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले की, ‘याप्रकरणी राज्यव्यापी एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. पोलिस अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समांतर ‘एसआयटी’ असणार आहे. याप्रकरणात कोणाचीही हयगय केली जाणार नाही, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. याप्रकरणी कोणताही संस्थाचालक असेल तरी त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.’

    नाना पटोलेंच्या प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल उत्तर, सभागृहात हास्यकल्लोळ

    ‘दोषींकडूनच निधीवसुली’

    ‘नागपूर प्रकरणात तपास सुरू आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत १९ जणांविरोधात फौजदारी कारवाई झालेली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक समिती स्थापन करण्यात आली असून, या चौकशीत जे कोणी दोषी आढळून येईल, त्यावर कारवाई करण्यात येईल’, अशी माहिती भुसे सभागृहात दिली. दोषींकडून शासकीय निधीचा अपहार झाल्याचे समोर आले असून, या निधीची वसुली दोषींकडून करण्याबाबत चौकशीअंती निर्णय घेतला जाईल, असे भुसे म्हणाले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा