Sanjay Raut : हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्या संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केले असून, या संदर्भात निर्णय घेण्यासाठी समिती नेमली आहे. त्यामुळे ५ जुलैचा नियोजित मोर्चा आता होणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
“हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द! हा मराठी एकजुटीचा विजय, ठाकरे एकत्र येणार याचा धसका, 5 जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही; पण.. ठाकरे हाच ब्रँड! फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय. छान”, असं संजय राऊत आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द!हा मराठी एकजुटीचा विजय,ठाकरे एकत्र येणार याचा धसका,५ जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही;पण..ठाकरे हाच ब्रँड!(फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय.छान) pic.twitter.com/eTm1Rei41B
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 29, 2025
देवेंद्र फडणवीस यांची नेमकी घोषणा काय?
“त्रिभाषा सूत्रा संदर्भात हिंदी भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी, मुलांना काय चॉईस द्यावी, याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती तयार करण्यात येईल. त्यांच्या नेतृत्वात एक समिती तयार केली जाईल. त्यात आणखी काही सदस्य असतील. त्यांची नावे लवकरच घोषित केली जातील. या समितीचा अहवाल आल्यानंतरच त्रिभाषा सूत्रबाबत निर्णय लागू केला जाईल. त्यामुळे 16 एप्रिल 2025 आणि 17 एप्रिल 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही शासन निर्णय रद्द करत आहोत”, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.”नवी समिती अभ्यास करेल. सर्वांचं म्हणणं ऐकून घेईल, त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी काय निर्णय घेता येईल ते अहवालात सांगेल. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळ तो निर्णय मान्य करेल. आमची नीती विद्यार्थी आणि मराठी केंद्रीत असेल. यामध्ये आम्हाला कोणतही राजकारण करायचं नाही”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

