• Sun. Jun 7th, 2026

    उद्धवसुद्धा भाषण करेल! राज ठाकरेंना रात्री फोन; मोर्चात नाव पुकारलं, तिथेच ठिणगी पडली अन्…

    उद्धवसुद्धा भाषण करेल! राज ठाकरेंना रात्री फोन; मोर्चात नाव पुकारलं, तिथेच ठिणगी पडली अन्…

    ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चेदरम्यान, मराठीच्या मुद्द्यावर उद्धव आणि राज ठाकरे ५ जुलैला एकत्र येणार आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ३३ वर्षांपूर्वी राज आणि उद्धव यांचा किस्सा महत्त्वाचा आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु असताना आता मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे एकत्र रस्त्यावर उतरणार आहेत. ५ जुलैला होणाऱ्या आंदोलनात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसतील. या मोर्चाची जोरदार तयारी शिवसेना उबाठा आणि मनसेकडून सुरु आहे. दोन्ही ठाकरे राजकीयदृष्ट्या संकटात आहे. त्यामुळे त्यांची युती होणार का, ठाकरे बंधू एकत्र येणार का, ५ जुलैचा मोर्चा युतीची नांदी ठरणार का, याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.

    ५ जुलैचा मोर्चा, मराठीचा मोर्चा ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी ठरु शकतो, असं महत्त्वाचं विधान शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मोर्चात एकत्र येणारे ठाकरे बंधू पुढेही सोबतच राहतील. त्यांची युती होईल आणि ठाकरे ब्रँड मजबूत होईल, अशी इच्छा असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण उद्धव आणि राज यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्याची सुरुवात एका मोर्चातूनच झालेली आहे. अनेकांना याची कल्पना आहे. कारण ही घटना ३३ वर्षे जुनी आहे.

    वरिष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘ठाकरे कझन्स’ पुस्तकात ठाकरे बंधूंच्या राजकीय वाटचालीचा इंत्यभूत तपशील देण्यात आलेला आहे. त्यातील एक किस्सा कुलकर्णी यांनी एका कार्यक्रमात सांगितला. मोर्चा आणि ठाकरे बंधू याबद्दल बोलताना धवल कुलकर्णी यांनी नियतीचा फेरा असा शब्द वापरला. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या संघटनेत नवे असतानाचा किस्सा कुलकर्णी यांनी कथन केला.

    ‘राज आणि उद्धव यांच्यामुळे कधीकाळी एका मोर्चामुळेच बिनसलं. १९९२ च्या आसपासचा तो काळ होता. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. त्यावेळी राज ठाकरे शिवसेनेची युवा आघाडी असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी राज्यभर दौरा केला. महिना-दोन महिने फिरुन त्यांनी राज्य पिंजून काढलं. हिवाळी अधिवेशन नागपुरात होतं. त्यावेळी राज ठाकरे तिथेच होते,’ असं कुलकर्णी यांनी सांगितलं.

    ‘एकीकडे नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सुरु होतं. राज ठाकरे सेंटर पॉईंट हॉटेलला उतरले होते. नागपुरात त्यांची सभा होती. त्याच्या आदल्या रात्री राज यांना फोन आला. उद्या तुझ्यासोबत उद्धवसुद्धा भाषण करेल, असं त्यांना सांगण्यात आलं. त्यावेळी राज ठाकरेंना एका गोष्टीची प्रकर्षानं जाणीव झाली. या पक्षात मी नेता होऊ शकतो. पण मला एक मर्यादा असल्याचं त्यावेळीच त्यांच्या लक्षात आलं,’ अशा शब्दांत कुलकर्णींनी ३३ वर्षांपूर्वीचा घटनाक्रम कथन केला.

    उद्धवसुद्धा भाषण करेल! राज ठाकरेंना रात्री फोन; मोर्चात नाव पुकारलं, तिथेच ठिणगी पडली अन्…

    ‘यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेना नेत्यांची सभास्थळी भाषणं सुरु झाली. ट्रकवरुन भाषणं सुरु होती. ऐनवेळी मनोहर जोशींनी उद्धव ठाकरेंचं नाव पुकारलं. आता उद्धव ठाकरेसुद्धा बोलतील, असं जोशींनी जाहीर केलं. उद्धव ठाकरेंना भाषणासाठी अचानक पाचारण करण्यात येत असल्याचं दाखवलं गेलं. उद्धव ठाकरेंचं भाषण झालं. मग राज यांनी भाषण केलं. तिथेच दोन बंधूंमध्ये पहिली ठिणगी पडली. त्या ठिणगीचं पुढे काय झालं, ते आपण नंतर पाहिलंच आहे,’ असा किस्सा कुलकर्णींनी सांगितला.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा