धुळे जिल्ह्यातील थाळनेर येथील राज्य विद्युत वितरण कंपनीतील वायरमन शिरपूर तालुक्यातील निमझरी येथे वीज जोडणीचे काम करत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
पुनमचंद चौधरी हे सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास विद्युत प्रवाहाच्या खांबावर चढून काम करीत असताना त्यांना विजेचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
सायंकाळी कुवे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी नंदलाल चौधरी यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, उपकार्यकारी अभियंता डी.एम. पाटील यांनी पुनमचंद चौधरी यांच्या कुटुंबियांचे सात्वंन केले व परिवारासाठी शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत करू असे आश्वासन दिले.
काही दिवसांपूर्वीच धुळ्यातील शिरपूर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली होती. आढे येथील शिवारात खरीप हंगामासाठी शेतात मशागत करत असलेल्या शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला होता. नथ्थू हार्दिक सनेर (वय ६०), रा. ताजपुरी, असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते आढे शिवारातील त्यांच्या शेतात खरीप हंगामासाठी बैलजोडीच्या सहाय्याने मशागत करत होते. शेतीकामच सुरू असतानाच सनेर यांनी औत थांबवला आणि ते बाजूच्या बांधावर विश्रांतीसाठी बसले होते. त्यावेळी हंड्यातील पाणी पिण्यासाठी झुकले असता अचानक आकाशात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला आणि त्या दरम्यान जोरदार वीज त्यांच्या अंगावर कोसळली ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

